लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षांच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या हरविलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना या मुलीला पोलिसांनी चंढीगडहून ताब्यात घेतले. त्यानंतर हा भयावह प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडितेवर बलात्कार करण्यात आला.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यात रेल्वेचे दोन कर्मचारी, ५ रिक्षाचालक आणि अन्य आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार तब्बल दोन दिवस हे नराधम या मुलीवर अत्याचार करत होते. पहिल्या दिवशी चौघांनी, तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय २७, रा. वैदूवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय ३२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ), रफिक मुर्तजा शेख (वय ३२, रा. मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय २७, रा. कासेवाडी), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय ३२, रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय २९, रा. घोरपडी गाव), नोईब नईम खान (वय २४, रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय ३६, रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडीत एका ठिकाणी माळीकाम करतात. ती तिच्या आईवडिलांसोबत राहते. ३१ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना याची माहिती न देताच ती पुणे स्टेशन परिसरात आली होती. मात्र, तो मित्र आलाच नाही. तसेच रात्री कोणतीही रेल्वे नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला रात्री राहण्याची सोय करतो, उद्या रेल्वेत बसवून देतो, असे सांगितले. त्यामुळे ती या रिक्षाचालकाबरोबर गेली.
रिक्षाचालकाने वाटेत आणखी एका रिक्षाचालकाला बरोबर घेतले. तेथून तिला एका लॉजला नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन रिक्षाचालकांनी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार कोणाला सांगितला तर, आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लोकांच्या ताब्यात तिला दिले. दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंढीगडकडे गेली होती.
--