कचऱ्यावरून झाली झाडाझडती
By Admin | Updated: August 24, 2015 03:10 IST2015-08-24T03:10:28+5:302015-08-24T03:10:28+5:30
शहरातील कचऱ्याचे उरुळी व फुरसुंगी येथील ओपन डंपिंग ७ आॅक्टोबरपर्यंत बंद करावे लागणार आहे. ही डेडलाईन अवघ्या दीड महिन्यावर आली, तरी महापालिकेच्या

कचऱ्यावरून झाली झाडाझडती
पुणे : शहरातील कचऱ्याचे उरुळी व फुरसुंगी येथील ओपन डंपिंग ७ आॅक्टोबरपर्यंत बंद करावे लागणार आहे. ही डेडलाईन अवघ्या दीड महिन्यावर आली, तरी महापालिकेच्या प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पारा चढलेल्या पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कचरा समस्येवरून धारेवर धरले.
शहरातील कचऱ्याच्या ज्वलंत प्रश्नांविषयी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी बैठक झाली. त्या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, आयुक्त कुणाल कुमार, सहआयुक्त सुरेश जगताप आदी उपस्थित होते. त्या वेळी शहरातील कचरा प्रक्रिया, बायोगॅस व गांडूळ खत प्रकल्पात निचरा होणारा कचरा व शिल्लक कचऱ्याचा आढावा घेण्यात आला.
शहरात रोज निर्माण होणाऱ्या ओला व सुका कचऱ्याची प्रत्येक प्रभागानुसार वस्तुनिष्ठ माहिती अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. त्यामुळे महापालिकेतील गटनेत्यांनीही कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीबाबत शंका उपस्थित केली. तसेच, केवळ ‘स्वच्छ’ या एका संस्थेवर अवलंबून राहून चालणार नाही.
कोणत्याही एक संस्थेची व कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली की, कचरा प्रश्न सोडविणे अडचणीचे
ठरत असल्याचे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यावर बापट म्हणाले, ‘‘कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याची प्रमुख जबाबदारी महापालिकेची आहे. याविषयी मला कोणी विचारणार नाही. तरीही पालकमंत्री म्हणून मी स्वत: कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक, सर्व आमदार व खासदार यांनीही कचरा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.’’