अकरावीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:55+5:302021-01-08T04:27:55+5:30
पुणे : राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे राज्यातील काही प्रमुख महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश फेरी राबविली ...

अकरावीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी फेरी
पुणे : राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे राज्यातील काही प्रमुख महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश फेरी राबविली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे ७७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या महानगरपालिका पालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरी अखेरपर्यंत ३ लाख १४ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतला आहे. तसेच काही ठिकाणी दुसऱ्या प्रवेश फेरीचे प्रवेश सुरू आहेत.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार : राज्यातील अकरावीच्या ५ लाख ५८ हजार ७७० जगांसाठी ४ लाख ५१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील ३ लाख २१ हजार ९७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्यातील ४२ टक्के जागा रिक्त आहे. अद्याप २३ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. दुसरी विशेष फेरी झाल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी फेरी राबविली जाणार आहे.
पुण्यातील प्रवेशाची आकडेवारी
उपलब्ध जागा- १,०७,०३०
प्राप्त अर्ज - ७९,७९८
झालेले प्रवेश - ६१,३८०
रिक्त जागा - ४५,६५०
प्रवेश न मिळालेले विद्यार्थी १८,४१७
---
राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घेऊन कनिष्ठ महाविद्यालये सुरू करावीत. मात्र, शिक्षण विभाग व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.