कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: August 23, 2015 04:46 IST2015-08-23T04:46:15+5:302015-08-23T04:46:15+5:30
कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनीच कंबर कसली असून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे छायाचित्र काढून फ्लेक्सवर लावण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट

कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
पुणे : कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनीच कंबर कसली असून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे छायाचित्र काढून फ्लेक्सवर लावण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबतही अधिकाऱ्यांना बजावले.
दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पुण्याच्या कचऱ्याच्या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सर्व पक्षांचे गटनेते, पालिका आयुक्त कुणाल कुमार आदी या बैठकीस उपस्थित होते. पालिका आयुक्तांनी कचरा व्यवस्थापनाबाबत बैठकीत माहिती सांगितली. तसेच स्वच्छ संघटनेच्या मदतीने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच येत्या ७ सप्टेंबरपर्यंत शहरातील बहुतांश कचरा शहरात व शहरालगत निर्माण केलेल्या प्रकल्पामध्ये जिरविला तरीही ३00 ते ५00 टन कचरा शहराबाहेर टाकण्यासाठी डंपिंग ग्राऊंडची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकट्या स्वच्छ संघटनेवर अवलंबून न राहता पालिकेने स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी, अशी भूमिका गिरीष बापट यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी मांडली.
रस्त्यावर कचरा टाकण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांना शिस्त लागणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा पेटीच्या जवळ किंवा रस्त्यावर कचरा टाकणा-यांचे फोटो काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,असे स्पष्ट करून बापट म्हणाले,रात्री चायनिजच्या गाड्या किंवा हातगाड्या चालविणा-यांवर लक्ष देण्यासाठी पालिकेने यंत्रणा निर्माण करावी. शहरातील प्रत्येक नागरिकाची मानसिकता लक्षात घेवून कचरा व्यवस्थापनाबाबतच्या उपाययोजना करण्यास सांगितले. कच-याच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाने खोलवर विचार केला नसल्याने अधिका-यांची कान उघडनी केली.
कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून, तो एकट्या पालिका प्रशासनाला सोडविता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकाला यात सहभागी करून घ्यायला हवे, असे स्पष्ट करून बापट म्हणाले, कचरा विलगीकरणासाठी शहरातील पालिकेच्या जागांवर लहान प्रकल्प उभारावेत. सुक्या कचऱ्यापासून अनेकांना उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करावा. १0 टनापर्यंत सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्यांना लहान टॅम्पो उपलब्ध करून द्यावेत. कचऱ्याच्या प्रश्न सुटला नाही तर वॉर्डातील नागरिक पुढील काळात आताच्या नगरसेवकांना सत्तेपासून दूर ठेवतील. त्यामुळे नगरसेवकही हा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतील.ओल्या कच-यापासून खत निर्माण करण्यावर पालिकेने भर द्यावा.खतामधून प्लास्टिकच्या पिशव्या जात असल्याचे शेतक्-यांचा लक्षात आले तर शेतकरी खत घेण्यास नकार देतील.त्यामुळे खूप गंभीर प्रश्न निर्माण होईल.त्यसाठी चांगले खत निर्माण करा.