चिऊताईच्या आठवणींना उजाळा
By Admin | Updated: March 23, 2016 01:28 IST2016-03-23T01:28:24+5:302016-03-23T01:28:24+5:30
एरव्ही चिवचिव करत सकाळ प्रसन्न करणारी चिऊताई आता दिसेनाशीच झाली आहे, ही खंत प्रत्येकालाच... अशा वेळी भव्यदिव्य चिऊताई डोळ्यांसमोर साकारली तर त्यातून मिळणारा आनंद केवळ

चिऊताईच्या आठवणींना उजाळा
पुणे : एरव्ही चिवचिव करत सकाळ प्रसन्न करणारी चिऊताई आता दिसेनाशीच झाली आहे, ही खंत प्रत्येकालाच... अशा वेळी भव्यदिव्य चिऊताई डोळ्यांसमोर साकारली तर त्यातून मिळणारा आनंद केवळ अवर्णनीयच! हाच अवर्णनीय आनंद ३००० हून अधिक मुलींनी अनुभवला आणि चिऊताईच्या चिवचिवाटाच्या स्मृती पुन्हा उजळल्या. १५ बाय ८ फुटांचे चिऊताईचे लक्षवेधी कोलाज, वाया गेलेल्या कागदातून निर्माण झालेल्या पर्यावरणस्रेही रंगीबेरंगी प्रतिमा, कचऱ्यातून कला या संकल्पनेतून साकारलेल्या आगळ्यावेगळ्या वस्तू यातून पर्यावरणाची अनोखी जनजागृती करण्यात आली.
वाढते शहरीकरण आणि अनिर्बंध बांधकाम यामुळे चिमण्या हद्दपार होत आहेत. त्यांचे घटणारे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. याचबरोबर राजरोसपणे आढळणाऱ्या अनेक पक्ष्यांचे प्रमाणदेखील कमी होत आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने हडपसरमधील सी. बी. तुपे साधना कन्या महाविद्यालयामध्ये २० व २१ मार्च रोजी किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ३००० हून अधिक विद्यार्थिनींनी या ‘चिऊताई वाचवा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अर्थ डे, जागतिक चिमणी दिवस, जागतिक वन दिवस आणि जागतिक जलदिनाचे औचित्य साधून किर्लोस्कर न्यूमॅटिक कं. लि. आणि वसुंधरा क्लब यांच्या वतीने अभिनव पर्यावरण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांच्या या महोत्सवात ‘हसत खेळत पर्यावरण’ या दृकश्राव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वीज, जंगल, पाणी वाचवा, चिमण्या तसेच इतर पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, वन्यजीवन, पाणी वाचवा, पाणी जिरवा, कचऱ्याचा प्रश्न, पर्यावरणाचा वाढता ऱ्हास, पर्यावरणपूरकतेची गरज अशा विविध विषयांवरील दृकश्राव्य माहितीपट दाखवून विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली. ३००-३०० विद्यार्थिनींचे गट करून १० कार्यशाळांद्वारे पर्यावरणरक्षणाचा संदेश देण्यात आला.
‘कचरा ही समस्या नसून ती आपली अमूल्य संपत्ती आहे’ हा संदेश अधोरेखित करणारी कार्यशाळा हे वसुंधरा महोत्सवाचे आकर्षण ठरले. आपणांस नकोशा असलेल्या कितीतरी गोष्टी आपण फेकून देतो. त्याऐवजी त्यातून उपयुक्त आणि आकर्षक वस्तूंची निर्मिती कशी करावी, याचे प्रशिक्षण ‘कचऱ्यातून कला’ विद्यार्थिनींना देण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी कल्पकतेने हजारो वस्तू तयार करत सर्जनशीलता दाखवली.
या महोत्सवात विदुला म्हैसकर, आभा भागवत, संजय गोसावी आदी मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या वेळी किर्लोस्करचे सरव्यवस्थापक सुरेश मिजार, प्राचार्या पुष्पा देशमुख, वीरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते.