भीती, काळजी अन् भयाण शांतता

By Admin | Updated: February 2, 2016 01:39 IST2016-02-02T01:39:29+5:302016-02-02T01:39:29+5:30

भीती, काळजी अन् भयाण शांतता, असे वातावरण सोमवारी रात्री उशिरापर्यंत आबेदा इनामदार महाविद्यालयात होते. महाविद्यालयातील १४ विद्यार्थी मुरूड येथील समुद्रात बुडाल्याची

Fear, worry and silence silence | भीती, काळजी अन् भयाण शांतता

भीती, काळजी अन् भयाण शांतता

पुणे : भीती, काळजी अन् भयाण शांतता, असे वातावरण सोमवारी रात्री उशिरापर्यंत आबेदा इनामदार महाविद्यालयात होते. महाविद्यालयातील १४ विद्यार्थी मुरूड येथील समुद्रात बुडाल्याची घटना समजल्यामुळे सायंकाळी पाचपासून पालकांनी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. नात्यातील मुलगा, मुलगी मृत्युमुखी पडल्याचे समजल्यामुळे काही नातेवाइकांच्या भावनांचा बांध फुटत होता. परतु, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाइकांना परिसरातील नागरिक दिलासा देत होते.
महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या सहलीमध्ये गेलेला आपला मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ सुखरूप आहे का, याची माहिती घेण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास घटना घडूनही ८ वाजले तरीही महाविद्यालय प्रशासनाकडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली जात नव्हती. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण होते. पालकांकडून व विद्यार्थ्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडून महाविद्यालय प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली जात होती. दरम्यानच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवर समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची यादी फिरत होती. मात्र, यातील नावे अधिकृत धरू नका, महाविद्यालयाकडून जाहीर केल्यानंतर खात्री करा, असे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात होते.
महाविद्यालयाकडून अधिकृत यादी सूचनाफलकावर लावण्यात आली. तत्त्पूर्वी, ती सोशल मीडियावर फिरत होती. त्यानंतर काही पालकांनी हंबरडा फोडला. स्थानिक नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. प्रसारमाध्यमांवरूनही यादी प्रसिद्ध केली जात होती. त्यामुळे साडेआठ वाजल्यानंतर महाविद्यालयातील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली होती. महाविद्यालयाच्या आवारात अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने महाविद्यालयाच्या आवारात व प्रवेश द्वाराबाहेर पोलीस बंदोबस्त होता.
जुळ्या बहिणी दगावल्याने दु:खाचा डोंगर
पुणे : आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबाबत मुरूड जंजिरा येथे घडलेल्या दुर्घटनेने शिवाजीनगर, तोफखाना परिसरातील अन्सारी कुंटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. या कुटुंबातील जुळ्या मुलींना यात आपले प्राण गमवावे लागले. दोन्ही मुली व हे कुुटुंबही परिसरात अत्यंत शांत व परोपकारी म्हणून परिचित आहे. एकाच घरातील दोन मुलींच्या जाण्याने या सर्व परिसरावर शोककळा पसरली.
महाविद्यालयाकडून सायंकाळी ५ वाजता अन्सारी कुटुंबाला या घटनेची माहिती समजली. राफिया व साफिया अशा त्यांच्या दोन मुली महाविद्यालयात शिकतात. त्या जुळ्या आहेत. आई-वडिलांच्या मागे लागून त्या सहलीला गेल्या होत्या. मुलांच्या सहलीला अपघात झाला आहे एवढेच मुलींचे वडील मुमताज अन्सारी यांना समजले. लगेचच ते महाविद्यालयात गेले. तिथेच त्यांना आपल्या दोन्ही मुलींना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागल्याची माहिती समजली. त्यांच्याबरोबर आलेल्यांनी घरी ही माहिती दिली. दोघींची आई तसेच नातेवाइकांनी आकांत मांडला. स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके, सामाजिक कार्यकर्ते अरिफ बागवान यांनी त्यांचे सांत्वन केले. मुमताज अन्सारी यांचा बेकरीचा व्यवसाय आहे. आई गृहिणी आहे. राफिया व साफिया यांना एक लहान भाऊ आहे. कुटुंबात शिक्षणाची आवड असल्यानेच त्यांनी मुलींना महाविद्यालयीन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुली हुशार म्हणून परिसरात प्रसिद्ध होत्या. मुमताज अन्सारीसुद्धा या भागात सर्वपरिचित आहेत.
लाईफ गार्ड नसल्याने दुर्दैवी घटना घडली
पुणे : महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांनी सुचविलेल्या ठिकाणीच समुद्रकिनाऱ्यावर जावे, महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. मात्र, काही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही दु:खद घटना घडली. त्यातही समुद्रकिनारी लाईफ गार्ड असते, तर विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहलीसंदर्भातील अधिक माहिती देताना इनामदार म्हणाले, ‘‘महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्सच्या प्रथम, द्वितीय व तृतीय या तिन्ही वर्षांचे सुमारे १३० विद्यार्थी या सहलीत गेले होते. विद्यार्थ्यांबरोबर ८ प्राध्यापक व ३ शिक्षकेतर कर्मचारी, असा महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग होता. सहलीला गेलेले त्यातील १४ विद्यार्थी गेले असून, एकाची ओळख पटलेली नाही. या १४ विद्यार्थ्यांमध्ये १० मुली व ४ मुले आहेत. एक मिसिंग आहे, तसेच ६ विद्यार्थ्यांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाला याबाबतची माहिती कळविण्यात आली. महाविद्यालय प्रशासनाकडून स्थानिक रुग्णवाहिका व महाविद्यालयाचा इतरही स्टाफ पाठविण्यात आला. उर्वरित सर्व विद्यार्थी सुखरूप असून ते पुण्याकडे येण्यास रवाना झाले आहेत.

Web Title: Fear, worry and silence silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.