शेतक-यांचे मोडले कंबरडे
By Admin | Updated: March 2, 2015 03:13 IST2015-03-02T03:07:55+5:302015-03-02T03:13:48+5:30
शनिवारी दुपारनंतर रात्रभर झोडपून काढलेल्या पावसाने रविवारीही अवकळेचा मारा चालूच ठेवला. २४ तासांतच ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

शेतक-यांचे मोडले कंबरडे
पिंपरी : शनिवारी दुपारनंतर रात्रभर झोडपून काढलेल्या पावसाने रविवारीही अवकळेचा मारा चालूच ठेवला. २४ तासांतच ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मावळ तालुक्यात आकडेवारी उपलब्ध नसलेल्या अनेक ठिकाणी यापेक्षाही जोरदार पाऊस झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीने विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वातावरणातील बदलामुळे शहरात स्वाइन फ्लूचे संकट गडद झाले आहे, तर ग्रामीण भागातील लोकांचा दिनक्रमच बदलून टाकला आहे.
नेहमीच्या कामांमध्ये सर्वजण व्यस्त असतानाच या वर्षातील पहिल्या जोरदार अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसाने एकीकडे सर्वांना गारठून टाकले असतानाच अनेकांना या अवकाळीचा धक्का बसला आहे.
लग्न समारंभात विघ्न
शनिवारी लग्नतिथीचा चांगला मुहूर्त असल्याने शहर परिसरातील ८० हून अधिक मंगल कार्यालयांमध्ये दुपारी साखरपुडा समारंभ दणक्यात साजरे झाले. मात्र परण्याची वेळ झाली, नवरदेव थाटामाटात घोड्यावर बसला, कलवरे जोषात नाचत निघाले; इतक्यात पावसाने आपले रूप दाखविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मौजमजेने सरींमध्ये नाचणाऱ्या वऱ्हाडींना क्षणात वाढलेल्या पावसाने गारठून टाकले. लग्नाचा जोष एका घटकेनेच फिका पडला. लग्नामध्ये मोठे विघ्न आल्याने ऐनवेळी लॉनमध्ये लाखोंचा खर्च करून उभारलेल्या सेटवर पाणी सोडून बंदिस्त हॉलमध्ये दाटीवाटीने बसून लग्न उरकरण्याची वेळ वऱ्हाडी मंडळींवर आल्याचे चित्र रावेत, वाकड, किवळे, भोसरी, चिखली, रहाटणी परिसरातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये पाहण्यास मिळाले. काही ठिकाणी वधू-वर बोहल्यावर चढल्यावरच पावसाची लक्षणे दिसल्याने सजावटीचा खर्च वाया जाऊ देण्यापेक्षा भर पावसात लग्न लावण्याचे प्रकार झाले.
साचलेल्या पाण्याने हैराण
पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरवासीय पुरते हैराण झाले होते. काही कौलारू, तसेच पत्र्याचे छत गळके असल्याने पाणी गळतीने भाडेकरूंची झोप उडविल्याची माहिती मिळाली आहे. पिंपरी मंडईत पहाटेपासूनच भाजी खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना गाळ्यांमध्ये साचलेले पाणी उपसण्याची कसरत करण्याची वेळ आली. सकाळी ८ पर्यंत बादल्यांमध्ये भरून पाणी बाहेर टाकण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरूच होती. डेअरी फार्मकडून रेल्वेफाटक ओलांडून महामार्गाकडे येणाऱ्या रस्त्यावर, शंकरवाडी रेल्वे पूल, बोपोडीतील भुयारी मार्ग, पुनावळे भुयारी मार्ग, आकुर्डी-निगडीतील मार्गावरील सखल भाग आदी ठिकाणी पाणी साचल्याने चालकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागली.
पथारीवाले गायब
पावसाने झोडपल्यानंतर रविवारी शहरातील रस्त्यांवरून पथारीवाले गायब झाल्याचे चित्र दिसून आले. नेहमी गजबज राहणाऱ्या पिंपरी कॅम्प, थिसेनक्रुप चौकाकडून कॅम्पाकडे जाणाऱ्या मार्गालगत कोणताही पथारीवाला नसल्याने रस्ता बऱ्याच दिवसांनंतर मोकळा दिसून आला. हातगाड्यांवरून भाजी विकणारांचे प्रमाणही रोडावले. अनेकांनी घरी बसून आराम करण्यालाच पसंती दिली.
डांबरीकरणात खोळंबा
शहराच्या अनेक भागात सध्या डांबरीकरणाचा सपाटा सुरू आहे.
मात्र दोन दिवसांत पावसामुळे या कामाचा खोळंबा झाला आहे. हे काम बंद करण्याची वेळ कंत्राटदारांवर आली आहे.
नवीन पिकाला फायदा
पावसामुळे फलधारणा नसलेल्या बहुतेक बागायती पिकांना पाणी देण्याचा खर्च वाचला आहे. याचबरोबर उशिराने पेरणी केलेल्या व दाणे भरण्याच्या स्थितीतील ज्वारी, हरभरा या कोरडवाहू पिकांना पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकरी सांगतात.