व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा फोल
By Admin | Updated: May 10, 2017 04:15 IST2017-05-10T04:15:20+5:302017-05-10T04:15:20+5:30
निश्चलनीकरणाचा निर्णय होऊन आता सहा महिने झाले आहेत. मात्र बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, औंध, बोपोडी, सोमेश्वरवाडी

व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा फोल
लोकमत न्यूज नेटवर्क
बाणेर : निश्चलनीकरणाचा निर्णय होऊन आता सहा महिने झाले आहेत. मात्र बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, औंध, बोपोडी, सोमेश्वरवाडी परिसरातील एटीएममधील रोकडटंचाई अद्याप कायम आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना विविध ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.
निश्चलनीकरणाच्या दोन महिन्यांनंतरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून एटीएममध्ये काही प्रमाणात रोकडटंचाई अद्यापही जाणवत आहे. परिसरात सुमारे शंभर एटीएम आहेत, परंतु यातील सुमारे ३० टक्के एटीएम गेल्या काही दिवसांपासून रोकड नसल्याने बंद आहेत. काही बँकांच्या एटीएमवर बंद असल्याचे फलक पाहायला मिळतात, तर अनेक एटीएममध्ये आत गेल्यानंतर सदर एटीएम विविध कारणांनी बंद असल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांना या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशांसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत.
बँकांच्या आंतरशाखीय रोकड व्यवहारांवर शुल्क आकारणी करण्यात येत असल्याने तो पर्यायही नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. त्यातच सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने बाहेरगावी किंवा पर्यटनाला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रोकडटंचाई लक्षात घेता, घरातून निघतानाच जास्त रोकड जवळ बाळगण्यावर अनेकांचा भर आहे. मात्र एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांची धांदल उडत असल्याचे दिसून येत आहे.