खूनप्रकरणी आरोपींच्या कोठडीत २१ मेपर्यंत वाढ
By Admin | Updated: May 20, 2014 04:35 IST2014-05-20T04:35:21+5:302014-05-20T04:35:21+5:30
दांडेकर पुलाजवळील राजीव गांधीनगर येथे तरुणाच्या खून प्रकरणात आणखी साथीदारांचा सहभाग असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी खून केला,

खूनप्रकरणी आरोपींच्या कोठडीत २१ मेपर्यंत वाढ
पुणे : दांडेकर पुलाजवळील राजीव गांधीनगर येथे तरुणाच्या खून प्रकरणात आणखी साथीदारांचा सहभाग असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी खून केला, याचा उलगडा करण्यासाठी न्यायालयाने सहा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यु. एल. पाठक यांनी आरोपींना २१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संतोष ऊर्फ बाबू मारुती पातेरे (वय ३९), संतोष ऊर्फ भावड्या बाळासाहेब साळुंखे (वय २१), सत्यजित ऊर्फ न्यानू प्रकाश गायकवाड (वय २१ ), राजू पोपट मोहिते (वय ३२), नितीन विष्णू मानकर (वय ३७), गणेश रमेश कोळकर (वय २५, सर्व रा. पर्वती पायथा, सिंहगड रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत. सागर राजू वाघमारे (वय २६, रा. दत्तवाडी) याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता. नंदा साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. नंदा साळुंके यांचा मुलगा धनराज आणि त्याचा मित्र सागर वाघमारे हे दोघेही येथील घाटावर गप्पा मारत होते. त्या वेळी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला. या घटनेमध्ये धनराज व त्याची बहीण स्वाती हेही गंभीर जखमी झाले होते. आरोपींची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडे आणखी हत्यारे असण्याची शक्यता आहे. गुन्हा करण्यामागे कोण आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे कोणी पुरवली, कोणाकडून विकत घेतली, याबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अशोक जाधव यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला.