अतिक्रमण करून बुजवला ओढा
By Admin | Updated: May 24, 2016 05:49 IST2016-05-24T05:49:45+5:302016-05-24T05:49:45+5:30
लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे.

अतिक्रमण करून बुजवला ओढा
बारामती : लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे. याबाबत इंदापूरच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
एकीकडे शासन ओढा खोलीकरणाची आणि विस्तारीकरणाची कामे हाती घेत आहे. जलयुक्त शिवार हा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील यावरच आधारित आहे. परंतु लामजेवाडी येथील धनदांडग्या शेतकऱ्याने थेट ओढाच बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत येथील रहिवासी बळवंत बयाजी सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे तक्रार दिली आहे. सूर्यवंशी यांच्या शेतालगतच हा ओढा आहे. या ओढ्याला पावसाळ्यात मुबलक पाणी असते. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळीही चांगली राहते. मात्र, येथील एका शेतकऱ्याने सूर्यवंशी बाहेरगावी गेले असता
हा ओढा माती व दगड टाकून बुजवला आहे.
सुमारे ४२५ फूट लांबीचा ओढा या शेतकऱ्याने बुजवला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सूर्यवंशी यांनाच दमदाटी करण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओढ्याला पाणी आल्यास परिसरातील शेतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, ओढ्याचा नैसर्गिक प्रवाहच रोखल्याने शेती वाहून जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन या शेतकऱ्यावर तातडीने कारवाई करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे.
(प्रतिनिधी)