निवडणुकीचे ‘टाइम’ बजेट!
By Admin | Updated: March 22, 2016 01:48 IST2016-03-22T01:48:48+5:302016-03-22T01:48:48+5:30
एक वर्षावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने २0१५-१६ चे सुधारित व २0१६ -१७ चे मूळ जमा व खर्चाचे २९ नावीन्यपूर्ण योजनांचे ‘टाइम बजेट’ उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे

निवडणुकीचे ‘टाइम’ बजेट!
बापू बैलकर, पुणे
एक वर्षावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने २0१५-१६ चे सुधारित व २0१६ -१७ चे मूळ जमा व खर्चाचे २९ नावीन्यपूर्ण योजनांचे ‘टाइम बजेट’ उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सोमवारी मोठ्या खुबीने मांडले. ‘भाऊ, तुमचा पेहराव भारी, बोलणंही भारी अन् बजेटही भारीच!’ अशीच प्रतिक्रिया विरोधकांनी दिली.
जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था नाही. त्यामुळे त्यांना स्वत:चे निर्णय घेऊन निवडणुकीत मतदारांना खूष करता येत नाही. शासनाच्याच योजना मांडून त्या पूर्ण कराव्या लागतात. असे असतानाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चाणक्य बुद्धीचा वापर करून या वर्षीचे बजेट मांडले. यात पहिल्यांदाच २९ नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला असून, यात ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक विकासाची कामे करणे, ही महत्त्वाकांक्षी योजना आणली असून, यातून गावाची उन्नती व्हावी यासाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी करवसुली बंद असल्यामुळे अडचणीत आलेल्या ग्रामपंचायतींना यंदा गेल्या सहा महिन्यांत भरघोस निधी मिळाला आहे. एकट्या १४ व्या वित्त आयोगातून ९५ कोटी ६५ लाख ४२ हजार ७७६ इतका निधी मिळाला आहे. मुद्रांक शुल्कापोटीही भरघोस निधी मिळाला आहे. असे असताना विकासकामांसाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून कोणत्याही कार्यक्रमात ते गेले असता त्यांना ग्रामस्थांना एखाद्या कामाचे ठोस असे आश्वासन देता येत नव्हते किंवा दिलेले आश्वासन १00 टक्के पाळता येत नव्हते. त्यामुळे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी या बजेटमध्ये मोठ्या चपळाईने स्थानिक विकासकामांसाठी ३ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यात त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. ग्रामस्थही खूष आणि विरोधकही. आणि अध्यक्ष-उपाध्यक्षांची खुर्ची मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. बजेट मांडल्यानंतर झालेल्या चर्चेत एकाही विरोधकाने बजेटला विरोध न करता हे बजेट कसे चांगले आहे, हेच प्रकर्षाने मांडले. अखेर सत्ताधारी सदस्यांनीच, ‘या सभागृहात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण?’, ‘सावत्र आईनेच बजेटचं कौतुक केलं त्याबद्दल अभिनंदन,’ असे चिमटे विरोधकांना काढले. मात्र, तुम्ही-आम्ही एकत्र राहू, जिल्हा परिषदेचे निधी मिळून मिसळून वाटू, अशीच भूमिका शेवटपर्यंत विरोधकांची राहिली.
सत्ताधाऱ्यांचे चिमटे : सत्ताधाऱ्यांना बजेट मीटिंगमध्ये विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. गटनेते शांताराम इंगवले यांनी आशा बुचके यांना उद्देशून सावत्र आईनेच कौतुक केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे बोलल्यानंतर वातावरण थोडंसं गरम झालं. बुचके यांनी गटनेते तुम्ही तुमची खुर्ची खाली करा, तुमचे शब्द मागे घ्या, असे खडसावले. त्यावर इंगवले यांनी तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा असा टोला हाणला. मी कौतुकच केलं, असं सांगत या विषयावर पडदा पडला. त्यानंतर प्रताप पाटील यांनीही या सभागृहात सत्ताधारी कोण व विरोधक कोण? हे वातावरण पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळेच ही वेळ आली आहे, असे सांगितले. मात्र यावर काही सदस्यांनी काय... काय, असे म्हणत ओरड करत दुर्लक्ष केले.
जिल्हा परिषदेला शालेय मुलीच्या संरक्षणाचा विसर पडला. गेल्या वर्षी यासाठी निधी ठेवून काहीच खर्च करता आले नाही. या वर्षी तर ही योजनाच गायब झाली. त्यामुळे पुरवणी बजेटमध्ये दखल घ्यावी. दुष्काळ निवारणासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणे गरजेचे होते.
- गंगाराम जगदाळे,
मनसे
अधिकाऱ्यांना फटकारले; सदस्यांना खडसावले
जिल्हा परिषदेच्या निवडणुका वर्षावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी हे टाइम बजेट असल्याचे सांगत वेळेत कामे करा, असे फर्मानच अधिकारी व सदस्यांना काढले.
एक वेळ जिल्हा परिषदेत वारंवार येऊ नका; पण आपल्या मतदारसंघात राहून
कोणते कामे करायचे याचा
आढावा घेऊन विकास आराखडा तयार करा, अशा सूचना केल्या.
गरज पडल्यास अधिकाऱ्यांना तेथे बोलवा. जर अधिकाऱ्यांनी सदस्यांना सहकार्य केले नाही तर याद राखा, असा दमच भरला.
एकदा नियोजित केलेल्या कामात बदल करू नका. मीसुद्धा बदल करण्याचा आग्रह धरला तरी मलाही तो करू देऊ नका. एकही अधिकारी यापुढे माझ्या परवानगीशिवाय बाहेर जाता कामा नये, असे खडसावून सांगितले.
तसेच सदस्यांनी दिलेल्या तारखेनंतर दोन दिवस जरी उशीर झाला तरी वैयक्तिक
लाभाच्या योजना घेऊ येऊ नये. उशीर झाला तर अध्यक्षाला वाटेल तेथे तो निधी देईल. आता कुणी कुणासाठी थांबणार नाही, वाट पाहणार नाही. कारण आपल्याला डिसेंबरअखेर
बजेट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे.
सामान्य प्रशासन विभाग
जॉबफेस्ट व उद्योजकता मेळावा तसेच व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे- ५,००,०००/-
समिती संपर्क यंत्रणा - ५,००,०००/-
जिल्हा परिषद कर्मचारी यांचे सेवापुस्तक व गोपनीय अहवाल संगणकीकृत करणे- ५,००,०००/-
पंचायत विभाग
ग्रामपंचायत स्तरावर विकासकामे करणे- ३०००००००/- ग्रामपंचायतींना हायमास्ट दिवे पुरविणे- ५००००००/- आदर्श गाव प्रोत्साहन योजना - ४००००००/-
वीरपत्नींचा गौरव करणे- २,००,०००/-
पारंपरिक वाद्य साहित्य पुरविणे- ४३०००००/- जिल्ह्यातील महसूल गावांचे गावठाण सर्वेक्षण व भूमापन करणे- ५००००००/-
शिक्षण विभाग
जिल्ह्यातील इ. १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन कल चाचणी व समुपदेशन कार्यक्रम- ५,००,०००/-
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रविष्ट जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गौरव करणे- ५०,०००/-
आर. आय. एम. सी. प्रविष्ट विद्यार्थ्यांचा गौरव - ५०,०००/- जिल्हा परिषद शाळांना डस्टबिन पुरविणे - ५००००००/- इ. ५ वी ते ७ वी या वर्गांसाठी व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख - ५,००,०००/-
आरोग्य विभाग
‘वैभवलक्ष्मी’ स्त्रीजन्माचे स्वागत करणे- ३००००००/-
एन. ए. बी. एच. शासकीय रुग्णालयाचे राष्ट्रीयस्तरावर मानांकन करणे- २००००००/-
प्रतिभा आरोग्यसंपन्न योजना-सर्व महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी व औषधोपचार करणे- ५०००००००/-
मेघदूत आरोग्यसंपन्न यंत्रणा - १००००००/-
सप्ततारांकित आरोग्यसंपन्न ग्राम योजना- ५०००००/- प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना
डस्टबिन पुरविणे - १,००,०००/-
कृषी विभाग
नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना- ७४,८८,०००/-
पशुसंवर्धन विभाग
परसातील कुक्कुटपालन योजना- ६४४८०००/-
५०% अनुदानावर अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे- ५,००,०००/-
समाजकल्याण विभाग
इ. ५ वीतील मागासवर्गीय मुला-मुलींना व माध्यमिक शाळेतील मुलींना सायकल पुरविणे - २००००००००/-
शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका- २०५०००००/- मागासवर्गीयांना पारंपरिक वाद्य
साहित्य पुरविणे- १००००००/-
महिला व बालकल्याण विभाग
शाळांमध्ये मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरविणे-५००००००/- महिला ब्युटी पार्लरसाठी खुर्ची पुरविणे- ५००००००/- अंगणवाडीमध्ये कि चन गार्डनिंग सुरू करणे- ५०००००/- एकूण २९ नावीन्यपूर्ण योजनांचा सन २०१६-१७ च्या मूळ अर्थसंकल्पात समावेश केलेला आहे.