‘शिक्षणमंत्री हाय हाय’...पालकांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:18+5:302021-02-05T05:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शाळांच्या शुल्कात कपात ...

‘शिक्षणमंत्री हाय हाय’...पालकांची घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शाळांच्या शुल्कात कपात करावी, अशी मागणी पालकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे बालभारती येथे बुधवारी (दि. २७) केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने संतप्त पालकांनी ‘शिक्षण मंत्री हाय, हाय’ची घोषणाबाजी केली. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधातही यावेळी घोषणा देण्यात आल्या.
गेल्या काही महिन्यांपासून पालक व संस्थाचालकांमध्ये शालेय शुल्कावरून वाद सुरू आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेले परिपत्रक संदिग्ध असून पालकांना त्यामुळे दिलासा मिळालेला नाही. अनेक शाळा पूर्ण शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत. त्यामुळे ‘पॅरेंट्स असोसिएशन पुणे’च्या प्रतिनिधींनी वर्षा गायकवाड यांची भेट घेवून निवेदन दिले. देशातील अन्य राज्यांनी केलेल्या शुल्क कपातीची माहिती त्यांनी दिली. मात्र गायकवाड यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेता गुळमुळीत उत्तरे दिल्याने राज्य सरकार विद्यार्थी आणि पालकांच्या हिताच्या बाजूने नसल्याचे आमचे मत झाल्याची तक्रार पालकांनी यावेळी केली.
शालेय शुल्काबाबत शासन व काही शिक्षण संस्थांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पालकांच्या तक्रारी सीबीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांबाबत आहेत. त्यावर राज्य शासन कारवाई करू शकत नाहीत, असे उत्तर पालकांना देण्यात आले. शुल्कासंदर्भात इतर बोर्डाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याची पालकांनी केलेली मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे पालकांनी गायकवाड यांचा निषेध केला.
‘पॅरेंट्स असोसिएशन पुणे’च्या अध्यक्ष जयश्री देशपांडे म्हणाल्या की, राज्य शासनाकडून सर्व बोर्डाच्या शाळांना परवानगी दिल्या जात असल्याने या शाळांवर शासनाचे नियंत्रण हवे आहे. संस्थाचालक न्यायालयात पाच-पाच वकील देतात. त्यावेळी शासनानेसुद्धा जास्त वकील देऊन पालकांची बाजू मांडली पाहिजे. देशातील अन्य राज्यांनी १५ ते १६ टक्के शुल्क कपात केली आहे. इतर राज्यात शुल्क कमी होऊ शकते तर महाराष्ट्रातही ते झाले पाहिजे.
चौकट
शिक्षण संस्थांच्या धमक्या
ऑनलाइन शाळा सुरू असल्याने पालकांनी पूर्ण शुल्क न भरण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, पूर्ण शुल्क दिले नाही तर पुढच्या वर्षी शाळेत प्रवेश दिला जाणार नसल्याची धमकी काही संस्थांनी दिली आहे. त्यामुळे शुल्क कपातीच्या मुद्यावर शासनाने हस्तक्षेप करावी, अशी पालकांची मागणी आहे.
चौकट
शिक्षणमंत्री मागच्या दाराने पसार
‘बालभारती’च्या मुख्य दारात पालकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्षा केली. तिथेच त्यांनी निदर्शने केली. पालकांचा रोष पाहून गायकवाड यांनी मागच्या दारातून बाहेर पडणे पसंत केले. यावेळी उपस्थित काही काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचात वाद झाला. वातावरण गंभीर झाल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.