वनपरिक्षेत्र कार्यालय हलविल्याने नारायणगावात संताप
By Admin | Updated: November 17, 2016 02:40 IST2016-11-17T02:40:48+5:302016-11-17T02:40:48+5:30
वनपरिक्षेत्र पुनर्रचनेत नारायणगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर येथे हलविण्यात आल्याने जुन्नर तालुक्यात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

वनपरिक्षेत्र कार्यालय हलविल्याने नारायणगावात संताप
नारायणगाव : वनपरिक्षेत्र पुनर्रचनेत नारायणगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर येथे हलविण्यात आल्याने जुन्नर तालुक्यात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. नारायणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट्यांचा सर्वांत जास्त वावर असताना हे कार्यालय का हलविण्यात आले? असा सवाल केला जात आहे.
विशेष म्हणजे जुन्नर बिबट्या प्रवण क्षेत्र असून, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले आहेत. येथेच आवश्यकता असताना कार्यालय हलविण्याचा हा घाट का? असा सवाल केला जात आहे.
१ नोव्हेंबर २0१६ पासून नारायणगावचे कार्यालय बंद करून ते मंचर येथे हलविण्यात आले़ पिंपळगाव जोगा धरण झाल्यानंतर सन २00१ मध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा प्रश्न सुरू झाला़ तालुक्यात सर्वांत जास्त बिबट्यांचा गंभीर प्रश्न नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गतच सुरू आहे.
खेड, घोडेगाव, जुन्नर, नारायणगाव, ओतूर वनपरिक्षेत्रात आतापर्यंत २७ जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यातील १३ जण हे नारायणगाव वनपरिक्षेत्रातील आहेत. ५३८ जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत़ वनविभागाने नारायणगाव कार्यालयांतर्गत होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यासाठी विशेष पथक तयार करून खास बाब म्हणून मोबाईल व्हॅन दिली आहे, असे असताना नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय बंद करण्याचा निर्णय कसा घेतला गेला? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सभ्रमावस्था आहे.
नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय १९६४ रोजी सुरू झाले. जुन्नर वनविभागाअंतर्गत जुन्नर, नारायणगाव, ओतूर अशी तीन वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत़ त्यापैकी नारायणगाव कार्यालय बंद करण्यात आले़ दोन्ही तालुक्यांतील क्षेत्र आणि गावांचा विचार करता नारायणगाव कार्यालय हे जुन्नर तालुक्यातच राहणे आवश्यक आहे.
जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बिबट्यांचा उपद्रव सुरू आहे़
१00 हून अधिक बिबटे पकडण्यात आले असून, माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात एकूण
३१ बिबटे आहेत़ तर वनविभागाच्या सर्वेनुसार जुन्नर तालुक्यात ७0 हून अधिक बिबटे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़
बिबट्यांबाबत हा संवेदनशील तालुका असताना महत्त्वाचे कार्यालय बंद करून हलविण्याचा निर्णय घेतला जात आहे़.
कार्यालय पूर्ववत करा
४सर्वांत जास्त बिबटे नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गतच आहेत़ हे कार्यालय बंद केल्याने नारायणगाव वनविभागाअंतर्गत असलेले नारायणगाव, शिरोली, सावरगाव आदी परिसर जुन्नर वनविभागाला जोडण्यात आला आहे़ तर खोडद, बेल्हा परिसर ओतूर वनविभाग कार्यालयाला जोडण्यात आला आहे़ नारायणगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या आत्तापर्यंतच्या घटना लक्षात घेऊन नारायणगाव येथील वनकार्यालय पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे़ (प्रतिनिधी)