बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

By Admin | Updated: March 13, 2016 01:31 IST2016-03-13T01:31:10+5:302016-03-13T01:31:10+5:30

आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे

Due to drought in the horticultural area | बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

सोमेश्वरनगर : आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे. यामुळे शेकडो एकर ऊस जळाला आहे.
महिन्यापूर्वी नीरा डावा कालवा बंद झाल्यापासून वीर धरण ते इंदापूरपर्यंतच्या बागायती पट्ट्यातही पाण्याची कमतरता भासू लागली. हळूहळू ही कमतरता तीव्र होऊ लागली. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिके सोडून दिली आहेत. बोरवेल पूर्ण बंद झाली असून, २४ तास मोटारी चलणाऱ्या विहिरी अर्धा ते एक तासावर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्यांना तुटून जाणे बाकी आहे. तुटून जाणाऱ्या उसाला पाणी द्यावे की लहान ऊस जगवावा, हे समजत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे तर पाणीच नसल्याने त्यांची पिके पूर्णत: जळाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापूर्वी उसाची पिके भिजवली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या उसाला पाणी मिळालेले नाही. तुटून जाणाऱ्या उसाला पाणीच नसल्याने खोडवा उसाचे एकरी टनेज ३० वर आले आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याकडे दीड लाख टन, माळेगाव कारखान्याकडे एक लाख टन तर छत्रपती कारखान्याकडे अजून ७० हजार टनांच्या आसपास ऊस शिल्लक आहे. हा ऊस लवकरात लवकर गाळप करण्यासाठी शेतकी विभाग डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. सोमेश्वर कारखान्याने नुकताच दौंड शुगर कारखान्याशी ५० हजार टनांचा करार केला आहे. महसूलमंत्र्यांबरोबर बैठक होणे अपेक्षित होते; त्यांच्या अपुऱ्या वेळेमुळे बैठक होऊ शकली नाही. आता पुण्याचे पालकमंत्री बापट यांच्या निर्देशनानुसार नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन प्रस्तावित आहे.
- विजय नलवडे,
उपअभियंता, नीरा डावा कालवा

Web Title: Due to drought in the horticultural area