घाण पाण्यामुळे शेती होतेय नापिक
By Admin | Updated: June 12, 2014 05:15 IST2014-06-12T05:15:43+5:302014-06-12T05:15:43+5:30
हिंजवडी, आयटीनगरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगात प्रसिद्ध आहे. या नामांकित आयटी हबमधील काही कंपन्या माणमधील अन्नदात्याच्याच मुळावर उठल्या आहेत.

घाण पाण्यामुळे शेती होतेय नापिक
वाकड : हिंजवडी, आयटीनगरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगात प्रसिद्ध आहे. या नामांकित आयटी हबमधील काही कंपन्या माणमधील अन्नदात्याच्याच मुळावर उठल्या आहेत. कंपनीचे मैलामिश्रित पाणी थेट शेतात सोडले जात असल्याने जमीन नापीक होत असून शेतकरी हतबल झाले आहेत.
आयटी अधिकारी कसलीच दाद देत नसल्याने गेल्या ३ वर्षांपासून हा त्रास सहन करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच आयटी पार्कमुळे संपूर्ण जमीन संपादित झालेली असताना राहिलेली तोकडी जमीन तरी सुखाने कसू द्या, अशी विनवणी ते करीत आहेत.
हिंजवडी फेज तीन मधील जुनी डीएलएफ अन् आताची क्वॉडरन ही सुमारे ४० एकरात वसलेली आयटी कंपनी आहे. कंपनी कॅम्पसमध्ये अद्ययावत अन् झगमगाटातील मोठ-मोठे पाच टप्पे आहेत. येथे हजारो अभियंते आणि कामगार काम करतात. मात्र, कंपनीचे ड्रेनेज समोरील थेट शेतीत सोडण्यात आले आहे. हे दुर्गंधीयुक्त, दूषित अन् मैलामिश्रित पाणी येथील १५ एकर शेती पट्ट्यात पसरते. सखल भागात तर गुडघाभर पाणी साचते. गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे.
१५ एकराच्या पट्ट्यात माणवासीयांची शेतजमीन आहे. येथे पावसाळ्यात भात तर हिवाळ्यात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. मात्र, शेतीत सातत्याने दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने शेतीत दलदल झाली असून शेतकऱ्याला जाणे-येणे अशक्य झाले आहे. तर अनेकांना या मैलामिश्रित पाण्याने हाता-पायाला त्वचारोग जडले आहेत. भात पेरणीसाठी आधी शेतीची मशागत करावी लागते. मात्र, या दूषित पाण्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. मान्सूनला कधीही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे पेरणी कशी होणार, याची चिंता आहे.
एकदा वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गेटवर ते पाणी आमचे नाही, तसेच तुमचा आमचा संबंध नाही, तुम्ही आमदार, खासदार कोणाकडेही काय करायचे ते करा, असे त्याने सुनावले.
याबाबत या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते सुधीर नागे म्हणाले, ‘‘काही लोकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. मी शुक्रवारी आमच्या काही उपअभियंत्यांना घेऊन त्या
जागेची पाहणी करणार आहे.
पाणी नेमके किती येते कुठून येते, या सर्वांची पाहणी करून नंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यावर लवकर उपाय योजना करणार आहे.’’(वार्ताहर)