खराब रस्त्यांमुळे दौंडचा विकास खुंटला
By Admin | Updated: June 6, 2015 22:10 IST2015-06-06T22:10:52+5:302015-06-06T22:10:52+5:30
दौंड तालुक्यामधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या तिजोरीमधून कोट्यवधीचा निधी टाकला जात असतो

खराब रस्त्यांमुळे दौंडचा विकास खुंटला
खोर : दौंड तालुक्यामधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या तिजोरीमधून कोट्यवधीचा निधी टाकला जात असतो; मात्र एवढा सगळा निधी कोठे जातो, हेच कळायला मार्ग उरला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यामधील रस्त्यांची कामे, गाव वस्त्यांवरील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येतात़ मात्र, डांबरीकरणानंतर महिन्याच्या आतच कित्येक रस्ते उखडले जातात. काही ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर केल्यामुळे, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, डांबरीकरणानंतर पहिल्याच पावसात रस्ता खड्ड्यात अशी अनेक प्रकारची उदाहरणे दौंड तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहेत.
अनेक ठिकाणी घाटामधील रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीमध्ये असल्याने प्रवाशांना अपघातांना सामोरे जाण्याची वेळ आलेली
आहे. दौंडचा पश्चिम भाग,
दक्षिण भागामध्ये जास्त करून
दुर्दैवी अशी अवस्था पाहावयास
मिळत आहे.
दौंड तालुक्यामध्ये पाहिले
गेले तर राहु-पारगाव रस्ता, खोर-भांडगाव रस्ता, कासुर्डी-बोरीऐंदी
रस्ता, देऊळगाव-पेडगाव रस्ता,
राहु-वाघोली रस्ता, पाटस-बारामती रस्ता, सिद्धटेक-दौंड रस्ता, राहु-यवत रस्ता, पाटस-वासुंदे रस्ता,
वरवंड-कानगाव रस्ता, वासुंदे-बारामती रस्ता, राहु-दहिटणे रस्ता, राहु-उंडवडी-यवत रस्ता, पारगाव नदीवरील
रस्ता अशी कित्येक उदाहरणे
रस्त्याच्या उदासिनतेच्या बाबतीत लक्षात येत आहेत. निकृष्ट पद्धतीची कामे होत असल्याने दहा ते पंधरा दिवसांच्या आतच कामे खड्ड्यात
जात आहेत.
दौंड तालुक्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था होण्यामध्ये- जवळपास ८0 टक्के रस्ते हे बेकायदेशीर खोदाईमुळे खराब होत आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी बेकायदेशीररीत्या रस्त्याची खोदाई केली जाते. प्रथम यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, शेतकरी अशी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता- रस्त्यामध्ये जेसीबी-टिकाव यांच्या साहय्याने खोदाई करीत असल्याने रस्ते खराब होत आहेत़ मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत निष्क्रिय होत चालल्याचे दिसत आहे. तेवढ्या पुरतीच वरवरची मलमपट्टी करून पुढाऱ्यांची, ग्रामस्थांची नाराजी दूर केली जात असते. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी अवस्था रस्त्यासंदर्भामध्ये होत चालली आहे़
(वार्ताहर)