मधुमेह, रक्तदाब, दमा असला तरी घाबरू नका, नियंत्रणात ठेवल्यास कोरोनाला हरवू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:26+5:302021-04-25T04:10:26+5:30

पुणे: कोरोनाची भीती सगळ्यांच्याच मनात घर करून बसली आहे. मधुमेह, रक्तदाब, दमा किंवा असे आजार आहेत (कोमॉर्बिटी) ...

Don't panic if you have diabetes, high blood pressure, asthma, corona can be lost if controlled | मधुमेह, रक्तदाब, दमा असला तरी घाबरू नका, नियंत्रणात ठेवल्यास कोरोनाला हरवू शकतो

मधुमेह, रक्तदाब, दमा असला तरी घाबरू नका, नियंत्रणात ठेवल्यास कोरोनाला हरवू शकतो

पुणे: कोरोनाची भीती सगळ्यांच्याच मनात घर करून बसली आहे. मधुमेह, रक्तदाब, दमा किंवा असे आजार आहेत (कोमॉर्बिटी) त्यांच्यातील अनेकांंनी कोरोनाचा धसका घेतलेला दिसतो. मात्र हे आजार नियंत्रणात ठेवले तर असे रूग्ण कोरोनाचा धोका टाळू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे.

नियमित औषधे, वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती व घरच्या घरी काही साधे, हलके व्यायाम प्रकार केले तर असाध्य आजाराच्या रुग्णांचीही प्रतिकारशक्ती वाढून कोरोना त्यांच्यापासून लांब राहू शकतो, असे या तज्ज्ञांनी लोकमतबरोबर बोलताना सांगितले.

* मधुमेह किंवा तत्सम असाध्य व्याधी असणाऱ्या रुग्णांनी कोरोनाच्या भीतीने आपले रूटीन बिघडू देऊ नये. विशेषतः सुरू असलेले औषध बंद करू नये अथवा मनानेच नवे सुरू करू नये.

* मधुमेही रूग्णाने या काळात आपली साखर (शुगर) कंट्रोलमध्येच ठेवायला हवी. कारण साखर वाढली तर धोका जास्त असतो. शिवाय कोरोना झालाच तर त्यावरच्या उपचाराला मर्यादा येतात.

* मधुमेह किंवा कोणताही असाध्य आजार असलेल्या व्यक्तीने आपला तो आजार नियंत्रणात ठेवला पाहिजे.

* मास्क, सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे हे नियम कोरोना होऊ नयेत यासाठीच आहेत. असाध्य व्याधी असणाऱ्यांना संसर्ग व्हायचा धोका सर्वाधिक, म्हणून हे नियम कसोशीने पाळावेतच

* बरेचसे रूग्ण भीतीने जेवण घ्यायचे टाळतात. औषधे घेत नाहीत. त्यामुळे प्रकृती बिघडण्याचा धोका जास्त असतो. थकवा येतो, त्यातून साखर अनियंत्रित होते. त्यामुळे असे करणे टाळावे.

* इतके करूनही कोरोना झालाच, म्हणजे प्राथमिक लक्षणे जसे की सर्दी, ताप, अंगदुखी वगैरे दिसू लागली तर अजिबात घाबरू नये.

* कोरोनाची लक्षणे जाणवली की त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांना आपल्या आधीच्या आजाराची पूर्ण कल्पना द्यावी.

*कोरोना प्रोटोकॉल म्हणून काही प्राथमिक तपासण्या अत्यावश्यक असतात. त्या करून घ्याव्यात.

* कोरोना कोणत्या तीव्रतेचा आहे हे निश्चित झाले की त्यानंतरच्या सर्व गोष्टी वैद्यकीय सल्ल्याने कराव्यात.

आधीच्या आजारांची माहिती दिलेली असल्याने डॉक्टरांकडून त्याचीही काळजी घेतली जाते.

डॉ. शैलजा काळे

मधुमेहतज्ज्ञ,

---//

* असाध्य व्याधी म्हणजे डायबेटिसपासून ते दमा, किडनी, रक्तदाब असे आजार बऱ्याच वर्षांपासून असलेले रूग्ण. यातल्या प्रत्येकाने त्यांच्या डॉक्टरने सांगितलेली सर्व पथ्ये नियम या कोरोना काळात पाळलेच पाहिजेत.

* या प्रत्येक आजाराचे पथ्य औषधे वेगवेगळी आहेत, साम्य एकच आहे व ते म्हणजे या रूग्णांचे वजन जास्त असेल तर ते त्यांनी कमी केले पाहिजे. कारण कोरोनाचा आजार या एका गोष्टीमुळे त्यांना लवकर गाठू शकतो. वजनावर नियंत्रण आणणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्या काटेकोरपणे कराव्यात.

* कोरोनाच्या झोनमध्ये प्रत्येकजण आहे. त्यामुळे असाध्य आजार असेल तर लवकर होतो, बाकीच्यांना नाही होत असे काहीही नसते.

* त्यामुळे उगीच गर्भगळीत होऊ नये. उलट मानसिकदृष्ट्या कणखर होण्याचा या काळात प्रयत्न करावा. त्यासाठी अनेक उपाय आहेत. ते जाणीवपूर्वक करावेत

* उच्च किंवा कमी रक्तदाब, किडनी विकार, मधुमेह, हे आजार नियंत्रणात ठेवता येतात. कोरोनाकाळात त्याकडे जास्त लक्ष देऊन ते कंट्रोलमध्ये आणावेत.

*कोरोना झालाच तर याच गोष्टी उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे त्या कटाक्षाने कराव्यात

* काळजी घेऊनही कोरोना झालाच तर तो अनेकांना होतो, तसा आपल्याला झाला हे लक्षात घेऊन घाबरून जाऊ नये. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या त्यात प्राण गमावलेल्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

* घाबरले तर उपचारांमध्ये अडथळे निर्माण होतात, त्यामुळे कोरोनावरचे उपचार शांतपणे करून घ्यावेत. होम आयसोलेशन सांगितले तर त्यावेळी आधीच्या आजारात घेत असलेल्या औषधांची पूर्ण माहिती डॉक्टरांंना द्यावी.

डॉ. अनंतभूषण रानडे

कर्करोगतज्ज्ञ

माजी अध्यक्ष- इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी

Web Title: Don't panic if you have diabetes, high blood pressure, asthma, corona can be lost if controlled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.