रंगला सखींचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2015 00:32 IST2015-05-24T00:32:35+5:302015-05-24T00:32:35+5:30
अप्सरा आली..., शिट्टी वाजली, ललाटी भंडार, मेरा पिया घर आया, आ आन्टे, मय्या यशोधा... अशा मराठी गाण्यावर महिलांनी ठेका धरत मोठ्या जल्लोषात सखी महोत्सवाची सांगता झाली.

रंगला सखींचा जल्लोष
पुणे: अप्सरा आली..., शिट्टी वाजली, ललाटी भंडार, मेरा पिया घर आया, आ आन्टे, मय्या यशोधा... अशा मराठी भन्नाट लावण्या, गोंधळ, भरतनाटयम, बॉलिवूड, दादा कोंडके ते आशिकी-२ या गाण्यावर महिलांनी ठेका धरत मोठ्या जल्लोषात सखी महोत्सवाची सांगता झाली.
लोकमत सखी मंच व बिग बझारच्या सहयोगाने आपल्या प्रतिभेला सशक्त मंच देणारा, कलागुणांची चौफेर उधळण करणारा सखी महोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ, थालिपीठ या पारंपरिक पदार्थांपासून स्टफ धिरडे, ओट्स दहीवडा अशा आधुनिक नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. विविध रंगांची उधळण करून सखींनी सामूहिकपणे काढलेल्या सुंदर रांगोळ्यांनी बिग बाजार फुलून गेला होता. पहिल्या दिवशीच्या समूह रांगोळी, पाककृती, पृष्प सजावट, समूह गीत आदी स्पर्धांमधून सखींनी आपल्या कलागुणांची झलक दाखविली.
महोत्सावाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सोलो नृत्य स्पर्धा, ब्रायडल मेकअप स्पर्धा, मेहंदी स्पर्धेने झाली. या वेळी महिलांनी दुल्हा-दुल्हन मेहंदी,इंडो-अरेबिक, पारंपरिक मेहंदी प्रत्येक स्त्रीच्या हातावर दिसत होती. तसेच ब्रायडल मेकअपमध्ये वधू मेकअप, मॉडेल मेकअप व साधा मेकअप करून प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावर या महोत्सावात आनंदाची झलक दिसत होती. फॅशन शोमध्ये महिलांनी भारतातील विविध राज्यांची ओळख असणारी वेशभूषा या वेळी सादर केली. तसेच कोणी देवीचा अवतार घेऊन, तर कोणी अप्सरा बनून रंगमंचावर उतरल्या होत्या. या वेळी या महोत्सवामध्ये पार पडलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण नागरिक या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आलेल्या सचिन खेडकर, मिलिंद सोमण, दिलीप प्रभावळकर, संभाजी भगत, दिग्दर्शक जयप्रसाद देसाई, निर्माते सचिन चव्हाण, लोकमतचे जय तिवारी, बिग बझारचे सुमित रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)
४सखी महोत्सवामध्ये ‘नागरिक’ या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकारांबरोबर गप्पा-टप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान अभिनेते सचिन खेडेकर, दिलीप प्रभावळकर, मिलिंद सोमण, दिग्दर्शक जयप्रद देसाई, निर्माते सचिन चव्हाण व संभाजी भगत यांनी वास्तविक जीवनाशी जवळीक साधणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिक माहिती सांगितली. हा चित्रपट येत्या १२ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.