जि. प. अध्यक्षांनी घेतला मुख्याधिकाऱ्यांचा तास
By Admin | Updated: May 6, 2016 05:41 IST2016-05-06T05:41:40+5:302016-05-06T05:41:40+5:30
उमापसाहेब, तुम्ही या जिल्ह्याला शाश्वत विकासात एका उंचीवर घेऊन गेलात... अशी स्तुतिसुमनं उधळत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निरोप समारंभात बुधवारी आजी-माजी मुख्या

जि. प. अध्यक्षांनी घेतला मुख्याधिकाऱ्यांचा तास
पुणे : उमापसाहेब, तुम्ही या जिल्ह्याला शाश्वत विकासात एका उंचीवर घेऊन गेलात... अशी स्तुतिसुमनं उधळत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निरोप समारंभात बुधवारी आजी-माजी मुख्याधिकाऱ्यांचा तास घेतला.
निमित्त होते जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रं हाती घेतलेल्या दौलत देसाई यांच्या स्वागत समारंभ व मावळते मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांच्या निरोप समारंभाचे.
सुरुवातीलाच कंद यांनी, मी खोटे बोलत नाही असे स्पष्ट करीत अधिकारी हा मावळता व उगवता असा कोणी नसतो. अधिकारी हा कायम अधिकारीच असतो, असे सांगत उमाप यांच्या कार्यकाळत झालेल्या चांगल्या गोष्टींबरोबर मी त्यांच्यातील उणिवाही दाखवून देणार हे स्पष्ट केले.
आयएसओ उपक्रमामुळे जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा वाढली. काही विभागात आपण चैतन्य निर्माण केलेत... बेरोजगारांना रोजगाराचा हात दिलात... असा गौरव करीत व्यसनमुक्तीसाठी हाती घेतलेले अभियान ही खरी आजची गरज आहे. तुम्ही ते हाती घेतलेत, आता देसाईसाहेब, तुम्ही जर ते प्रभावीपणे राबविले तर तुमचं नाव या जिल्हा परिषदेत आयुष्यभर राहील, कारण त्यामुळे जिल्ह्यातील काही कुटुंबांचे उद्ध्वस्त झालेले संसार सुरळीत होणार आहेत, असे सांगत त्यांच्यापुढील आवाहनही स्पष्ट केले.
प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन समाज करीत असतो. मला काही गोष्टींचे समाधान निश्चत आहे. उमापसाहेब माणूस म्हणून आपल्या इतका चांगला माणूस शोधूनही सापडणार नाही, पण दोन गोष्टी मला खटकल्या. एक म्हणजे आपल्याला वेळेचा योग्य उपयोग करता आला नाही व दुसरं म्हणजे यावर्षीचं बजेट फक्त ६0 टक्के खर्च झालं हे मोठं अपयश आहे. हे सांगत असतानाच देसाईसाहेबांपुढे कोणते आवाहन आहे हेही ते सांगायला विसरले नाहीत. पुढील बजेट हे आमचे टाईम बजेट आहे. डिसेंबरमध्येच ते पूर्ण करायचे आहे. तसे नियोजन केले आहे. याचे प्रचंड प्रेशर असणार आहे, तेव्हा आजपासूनच कामाला लागावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत येणारी समस्या ही फिल्टर होऊन येते. आधी ग्रमापंचायत, नंतर पंचायत समिती व त्यानंतर जिल्हा परिषद, पण महापालिकेत साहेब तसे नाही, लोक थेट समस्या आयुक्तांच्या दालनात घेऊन येतात. तेव्हा महापालिकेत तुम्हाला गतीने निर्णय घ्यावे लागणार आहेत, ते व्हावेत ही उमाप यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करीत देसाई यांना काही सल्ले त्यांनी दिले. आपल्या दालनात सदस्यांचा खूप पाहुणचार करू नको. त्यांना चहाही पाजू नका, तो हवा असेल तर माझ्याकडे पाठवा.. पण मानसिकता चांगली ठेवून काम करा. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा, पण कारवाईतही मागेपुढे पाहू नका. आपण बरेच दिवस परदेशात राहिला आहात. ती वाढलेली दृष्टी जिल्हा परिषदेलाही द्या. १00 टक्के गतीने काम करा पण नियमात बसून, मग ते काम अध्यक्षांचे का असेना. शेवटी अधिकारी व पदाधिकारी ही गाडीची दोन चाकं आहेत. त्यांच्या त्यांच्या भूमिकेत
ती पळाली तर जिल्हा परिषदही नक्कीच पळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यानंतर उमाप यांचा तलवार भेट देवून सत्कार करण्यात आला. सत्कारला उत्तर देताना त्यांनी मी पदाधिकाऱ्यांना कामाचे सादरीकरण करण्यात कमी पडलो असे सांगितले. तसेच नूतन मुख्याधिकारी देसाई यांनी पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मी प्रयत्न करेल असे अश्वासन दिले. (वार्ताहर)
आज ठरवा हो काम करायचेय!
मुळशीच्या गटविकास अधिकारी या महिला असूनही त्यांनी तालुका हगणदारीमुक्त केला. तुम्ही सर्वांनी ठरवले तर जिल्हा हगणदारीमुक्त होऊ शकतो. त्यामुळे आज तुम्ही ठरवा हो ! काम करायचे आहे, असे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी केले.