कर्तृत्वाचा सन्मान गरजेचा

By Admin | Updated: January 9, 2017 02:48 IST2017-01-09T02:48:25+5:302017-01-09T02:48:25+5:30

विधवेचे स्त्रीत्व सन्मानित करण्याची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी घेतली. मात्र, विधवेचे मातृत्व सन्मानित करण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाई फुले

Dignity should be respected | कर्तृत्वाचा सन्मान गरजेचा

कर्तृत्वाचा सन्मान गरजेचा

पिंपरी : विधवेचे स्त्रीत्व सन्मानित करण्याची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी घेतली. मात्र, विधवेचे मातृत्व सन्मानित करण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. महात्मापणाला शोभेल असे कर्तृत्व भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी रुजविले. सावित्रीबाईंना इतिहासाने महात्मा पदवी दिली नाही. तथापि, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तरी त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करताना महात्मा म्हणून त्यांना वंदन केले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी येथे केले.
महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
या वेळी आमदार दीप्ती चौधरी, कलाकार प्रज्ञा पाटील व्यासपीठावर होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे माहात्म्यपण सर्वार्थाने पेलून नेणाऱ्या सावित्रीबाईंचे योगदानही समजून घेण्याची गरज आहे. बहुजनांना शिक्षणाची दारे बंद झालेल्या कालखंडात फुले यांनी शाळा काढल्या. पण, सावित्रीबाईंनी या शाळा चालविल्या. दलितांना शिक्षणाचे धडे दिले. एवढेच नव्हे, तर ब्राह्मण समाजाने शिक्षण नाकारलेल्या ब्राह्मणांच्या मुलींनाही ज्ञान देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या घरातूनही त्यांना विरोध झाला. पण, हा विरोध पत्करून त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. ती आद्यशिक्षिका, लोकशिक्षिका आहे. समाजप्रबोधन करून सत्याच्या अटीमध्ये सबंध माणुसकीचा गहिवर पेरणारी ती माऊली आहे.’’
‘‘आजचा महाराष्ट्र आपल्याला जातिमुक्त करायचा असेल, धार्मिक ऐक्य घडवून आर्थिकदृष्ट्याही संपन्न करायचा असेल, मानवतावादाची आपल्याला पुन्हा पेरणी करायची असेल, तर समाजात आग लावणाऱ्या जाती-धर्माचे भांडणे लावणाऱ्या सर्व प्रवृत्ती आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील. तरच आपण महात्मा आणि सावित्रीबाईंचे वारस ठरू शकू,’’ असेही ते म्हणाले.
मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा चव्हाण, दत्तात्रेय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महादेव भुजबळ यांनी आभार मानले. विश्वास राऊत, नितीन ताजणे, अनिल साळुंखे, शंकर जाठे, जतिन क्षीरसागर, वैजनाथ माळी, राजेंद्र बरके, श्रीहरी हराळे, विजय देडगे, नरहरी शेवते यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Dignity should be respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.