उत्सवावर डेंगी, स्वाइन फ्लूचे सावट
By Admin | Updated: September 16, 2015 02:51 IST2015-09-16T02:51:24+5:302015-09-16T02:51:24+5:30
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात स्वाइन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या दोन आठवड्यांत डेंगीची लागण झालेले

उत्सवावर डेंगी, स्वाइन फ्लूचे सावट
पुणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात स्वाइन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या दोन आठवड्यांत डेंगीची लागण झालेले तब्बल १४०, तर स्वाइन फ्लूची लागण झालेले ९२ नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धांदल उडाली आहे.
या उत्सवासाठी देशभरातून भाविक शहरात येत असल्याने आणि वारंवार होणाऱ्या पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे आरोग्य विभागाला या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी शहरात डेंगीने थैमान घातले होते, तर पाच वर्षांपासून पुणे हे स्वाइन फ्लूचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे दर वर्षी या आजाराचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाढतात. मात्र, या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीतच या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णालयांमधील गर्दी वाढू लागली आहे. (प्रतिनिधी)
डेंगीचे १४०, तर स्वाइन फ्लूचे ९२ रुग्ण
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात डेंगीची लागण झालेले तब्बल १४० रुग्ण आढळून आले आहेत. तर, स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा ९२वर पोहोचला आहे. म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी या दोन्ही आजारांचे पन्नासहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी जाऊन तसेच शाळा आणि इतर माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे. मात्र, पावसामुळे बांधकामे तसेच घरांच्या टेरेस आणि इतर ठिकाणी पाणी साठून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याने हा रुग्णांचा आकडा शहरात गर्दी वाढल्यास आणखी वाढण्याची शक्यता आहे.
१५ दिवसांत १२ मृत्यू
शहरातील स्वाइन फ्लूची स्थितीही गंभीर बनत चालली आहे. गेल्या १५ दिवसांत शहरात स्वाइन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यांतील बहुतांश रुग्ण हे शहराबाहेरील असले, तरी शहरात नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने ९, तर जुलै महिन्यात २ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मंगळवारी शहरात आणखी दोन रग्णांचा मृत्यू झाला. त्यात आंबेगाव तालुक्यातील फुलेवाडी येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा, तर दौंड तालुक्यातील पाटस येथील एका ४२ वर्षीय युवकाचा शहरातील खासगी रूग्णांलयांमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
कपातीने डेंगीचे संकट वाढणार
डेंगीच्या डासांची पैदास ही प्रामुख्याने स्वच्छ पाण्यामध्ये आढळून येते. शहरात मागील आठवड्यापासून एक वेळ पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवले जात आहे.
हे पाणी जास्त दिवस साठविले गेल्यास त्यात डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त तीन ते चार दिवसच पाणी साठवून ठेवावे, तसेच साठविलेल्या पाण्याच्या भांड्यावर अथवा बॅरेलवर झाकण ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत शहरातील डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, ही संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. तसेच, दंडात्मक कारवाईही केली जात आहे. डेंगीच्या तपासणी वेळी शहरातील अनेक टेरेसच्या ठिकाणी डासांची पैदास आढळून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात स्वच्छ पाण्याचे साठे होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. याशिवाय, शाळा तसेच गणेश मंडळांच्या माध्यमातूनही या आजाराविषयी जनजागृती करून ही साथ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख