‘पुरंदर उपसा’च्या पाण्याला मागणी
By Admin | Updated: January 12, 2017 02:11 IST2017-01-12T02:11:33+5:302017-01-12T02:11:33+5:30
दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या

‘पुरंदर उपसा’च्या पाण्याला मागणी
भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू असून ऐन दुष्काळी परिस्थीतीत गावाजवळील ओढे, नाले, गावतळी यांना प्राधान्य दिले जाऊन ती भरली जात असल्याने पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुरंदर तालुक्यातील लाभदायक क्षेत्रातील शेतीला आता सुगीचे दिवस आले आहेत; मात्र मोफत पाणी मिळत असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. योजनेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
योजनेचे पाणी शेतात ज्या व्हॉल्व्हवरून सुटते, त्याच्याजवळ राखणही शेतकऱ्यांनाच करावी लागते. मोफत पाणी असल्याने कुणीही कोठेही पाणी घेतात. यामुळे नियोजनानुसार पाणी देता येत नाही.
सध्या योजनेचे पाणी मोफत सुरू असून गावाजवळील पाणीसाठे भरण्याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे गावच्या विहिरी, बोरवेल यांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे. यामुळे पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेततळी खोदलेली आहेत. तीही सध्या भरण्याचे काम सुरू आहे. यामुळे काहीअंशी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटत आहे.
जे शेतकरी या योजनेच्या लाईनपासून दूर आहेत ते एकत्र येऊन स्वत: महागडी पाईपलाईन करून आपल्या शेतात पाणी नेत आहेत. पाणी व्यवस्थित मिळत असल्याने उत्पन्नही चांगले मिळत आहे.(वार्ताहर)
धावपळ
४पुरंदर तालुक्यात सध्या दोन पंपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तिसरा पंप सुरू करण्यासाठी योजनेच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली आहे. थोड्याच दिवसांत तिसराही पंप सुरू होईल.
४पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४,४५०, दौंड तालुक्यातील ३,७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६,४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे येथील शेतकरी समाधानी आहे. सध्या सुरू असलेल्या मोफत पाण्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. पाणी देण्यासाठी या योजनेचे अधिकारी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तारेवरची कसरत करीत आहेत. तरीही, नियोजनानुसार पाणी मिळत आहे.
- अरुण कोलते, लाभधारक शेतकरी
४शेतातून चांगले उत्पादन मिळाल्याने सर्वसामान्य शेतकरी आज आपल्या मुलांना चांगले शिक्षणही देत आहे.
४नवीन पिढीच्या भवितव्यासाठी ही योजना सोनेरी हिरा, गोरगरिबांच्या भवितव्याचा गळ्यातील ताईत बनली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी नेहमीच प्रयत्न करतात.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू आहे. पाण्याची मागणी वाढलेली आहे. यामुळे पाणी मिळण्यास उशीर होत आहे. नियोजनानुसार पाणी सुरू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
- साहेबराव भोसले, शाखा अभियंता