तळवडेतील ‘डीअर पार्क’ कागदावरच!
By Admin | Updated: December 18, 2014 04:36 IST2014-12-18T04:36:56+5:302014-12-18T04:36:56+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी यांच्यातील वादामुळे रखडलेल्या तळवडे येथील नियोजित हरीण उद्यानाचे (डीअर पार्क) भवितव्य अंधारमय झाले आहे
_ns.jpg)
तळवडेतील ‘डीअर पार्क’ कागदावरच!
नीलेश जंगम, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी यांच्यातील वादामुळे रखडलेल्या तळवडे येथील नियोजित हरीण उद्यानाचे (डीअर पार्क) भवितव्य अंधारमय झाले आहे. त्यामुळे भविष्यात येथे हरणांचा वावर होणार की, हरणांचे उद्यान केवळ कागदावरच राहणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राज्यातील पहिला प्रकल्प असणारा तळवडे येथील बहुचर्चित डीअर पार्क सरकारी गायरानाच्या जागेत उभारण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. या प्रकल्पामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात भर पडेल. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे केंद्र तयार होईल, असे सांगत या प्रकल्पाची जवळपास १६ वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. त्या दृष्टीने ९० एकर जागेत जुलै १९९८ मध्ये २५ हजार २७५ झाडांची लागवड करण्यात आली.
पार्कमधील पहिल्या टप्प्यात सांबर, भेकर, चिंकारा, काळवीट या
जातींची हरणे घेण्यात येणार असून, उद्यानात रस्ते, तलाव, नाले यांची कामे आहेत. नागरिकांना वाहनामध्ये बसून मुक्त अवस्थेत हरीण पाहता येईल, असे सांगण्यात आले होते. तथापि पालिका आणि एमआयडीसीच्या वादात या प्रकल्पासाठी अद्याप जागाच ताब्यात मिळाली नाही.
यामुळे १६ वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच आहे.
तळवडे परिसरात ८० हेक्टर गायरान होते. त्यांपैकी ४२ हेक्टर जागा एमआयडीसीला देण्यात आली होती. यातील ३८ हेक्टर जागा शिल्लक राहते. यातून २० हेक्टर जागा जानेवारी २००२ मध्ये पुन्हा एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात आली. मात्र जागेचा ताबा त्यांना देण्यात आला नाही. ज्यामुळे डीअर पार्कसाठी १८ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले. मात्र इतके क्षेत्र या प्रकल्पासाठी अपुरे पडत असल्याने एमआयडीसीला हस्तांतरित करण्यात आलेली जागा परत पालिकेकडे वर्ग करावी, अशी मागणी झाली. तथापि शासन दरबारी याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. जमीन ताब्यात येताच प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या संदर्भात शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून जागेचा तिढा सुटला की, कार्यवाही करता येईल, तोपर्यंत काहीही करणे अवघड आहे असे सांगण्यात येते.