पाणीकपाती वाढीबाबत लवकरच निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 01:36 IST2016-02-02T01:36:09+5:302016-02-02T01:36:09+5:30
धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

पाणीकपाती वाढीबाबत लवकरच निर्णय
पुणे : धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दौंड, इंदापूर तालुक्यातील नदीलगतच्या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी खडकवासला धरणातून १.६० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय पाणी नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीकपातीचा फेरआढावा घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने धरणामध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्क्यांनी कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील दौंड, इंदापूर येथे पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पाणी नियोजन समितीमार्फत पाणी सोडण्याचे निर्णय घेतले जातात. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरव राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
धरणसाठ्यातील पाण्याचे नियोजन करताना १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जाते. दौंड, इंदापूरला पाणी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फेरआढावा घेतला जाणार आहे.