दौंड शहरातील अतिक्रमणे हटवा!
By Admin | Updated: January 28, 2015 23:36 IST2015-01-28T23:36:21+5:302015-01-28T23:36:21+5:30
नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत दौंड शहरात बहुजन रयत परिषदेच्या वतीने रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दौंड शहरातील अतिक्रमणे हटवा!
दौंड : नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत दौंड शहरात बहुजन रयत परिषदेच्या वतीने रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष आबा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेजवळ गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच, पंचायत समिती ते पाटबंधारे कामगार वसाहतीपर्यंत असलेल्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, शहरातील ४३८ टपऱ्या काढून टपरीधारकांवर अन्याय करण्यात आला असून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दौंड नगर परिषदेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत टपरीधारकांचा मुद्दा नागरिक हित संरक्षण मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित करून निवडणूक जिंकली; मात्र त्यांच्या हाती एकतर्फी सत्ता आली, तरी अद्याप टपरीधारकांचा प्रश्न रेगाळलेला आहे. प्रभाग क्र. ४ मधील काही गरीब कुटुंबीयांचे हक्काचे घर रस्ता विस्तारीकरणासाठी पाडून त्यांना बेघर केले. मात्र, काही श्रीमंत लोकांनी शासकीय जागेत अतिक्रमण करूनदेखील त्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगरमध्ये अद्याप सार्वजनिक स्वच्छतागृह नाही या मुख्य मागण्या आहेत.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत रोज आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आबा वाघमारे यांनी सांगितले. रेल्वे कुरकुंभ मोरी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात आबा वाघमारे, चंदर गवारी, राजू काळे, सोमनाथ आगलावे, वसंत खंडाळे, महादेव ससाणे, दादा तुपसौंदर, महेश नवगिरे, कुसुम काळे, सुशांत वाघमारे, विकास शेलार, मुनीर सय्यद यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)