अनियमित भारनियमनामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:18+5:302021-02-05T05:05:18+5:30
अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. वेल्हे तालुक्यात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. ...

अनियमित भारनियमनामुळे पिकांचे नुकसान
अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. वेल्हे तालुक्यात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. तालुक्यात कोठेही एमआयडीसी किंवा एखादी मोठी कंपनी नसल्याने
तालुक्यातील तरुणांना रोजगारांचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे येथील तरुण शेतीकडे वळाला आहे. आधुनिक पद्धतीने व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वेल्ह्यात महावितरणकडून आठवडाभराचे लोडशेडिंग सुरु आहे. एक आठवडा दिवसभर वीज तर एक आठवडा रात्रभर वीज असते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे शेतीचे वेळापत्रक कोलमडले आहे. तर कोरोनामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतात गहू, ऊस, भेंडी, काकडी, मेथी, कोथिंबीर, मुळा, पालेभाज्या, टॅामेटो आदी पिके घेतली आहेत.
शेतीला वेळेवर पाणी मिळाले तरच पिके चांगली येणार आहेत. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता सर्पदंश झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी शेतीसाठी चोवीस तास वीज द्या, अशी मागणी शेतकरी संतोष लिम्हण, शिवराज शेंडकर,व गणेश जागडे यांनी केली आहे.