कोरोनामुळे नव्या रिक्षांच्या संख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:47+5:302021-06-22T04:08:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रसाद कानडे पुणे : कोरोनाकाळात पुण्यात नवीन रिक्षा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मागील ...

Corona caused a big drop in the number of new rickshaws | कोरोनामुळे नव्या रिक्षांच्या संख्येत मोठी घट

कोरोनामुळे नव्या रिक्षांच्या संख्येत मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रसाद कानडे

पुणे : कोरोनाकाळात पुण्यात नवीन रिक्षा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मागील दोन वर्षांची आकडेवारी लक्षात घेता जवळपास ७६ टक्क्यांची घट झाली आहे. पूर्वी उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जात होते. आता मात्र रिक्षाचा व्यवसाय शेवटच्या घटका मोजतेय की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे शहरात जवळपास ७२ हजार रिक्षा आहेत. काही वर्षांपूर्वी परिवहन विभागाने मागेल त्याला परमीट या धर्तीवर रिक्षाचे परमीट मोठ्या प्रमाणात वितरित केले. तेव्हापासून रिक्षाचे मीटर डाऊन झाले. २०१९ - २० या वर्षात पुण्यात ११,७६५ नव्या रिक्षाची आरटीओकडे नोंद झाली. तर २०२० - २१ या वर्षांत केवळ २८३२ इतकी नोंद झाली आहे. म्हणजेच रिक्षा घेण्याचे प्रमाण तब्बल ७६ टक्क्यांनी घटले आहे.

-----------------

काय आहेत कारणे :

1.परमीट संदर्भातला खुले धोरण. या काळात अनेकांनी परमीट घेऊन रिक्षांची संख्या वाढवली. याचा विपरीत परिणाम थेट व्यवसायवर झाला.

2. पहिल्या लॉकडाऊनचा फार मोठा फटका बसला. बँकांचे व फायनान्स कंपन्यांचे हप्ते भरणे मुश्कील झाले. यात व्यवसाय बुडाला. लोकांनी रिक्षा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय निवडला.

3.पूर्वी एका रिक्षाचालकाला दिवसांत किमान चारशे ते पाचशे रुपये मिळत. आता कसेबसे शंभर ते दीडशे मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी रिक्षा व्यवसायला रामराम केला.

--------------------

रिक्षाचा व्यवसाय आता पूर्वीसारखा राहिला नाही. रिक्षाचालकापेक्षा जास्त उत्पन्न मजूर वर्गाला मिळते आहे. कोरोनाच्या काळात रिक्षा व्यवसाय खूप अडचणीत आला. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना, पुणे.

------------------

परमीट खुले केल्याने अनेकांनी दुसरा व्यवसाय म्हणून अनेकांनी रिक्षाचे परमीट घेतले. त्यावेळी सर्व्हे करणे गरजेचे होते. तसेच लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कमी, रिक्षा जास्त ही परिस्थिती निर्माण झाली. उत्पन्न नाही. नव्या रिक्षावर १८ टक्के जीएसटी, तसेच परमीटसाठी ११ हजार द्यावे लागतात. एवढं खर्च करूनदेखील उत्पन्न नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसायाची भीती वाटत आहे. त्यामुळे अनेकांनी आता रिक्षा व्यवसायाकडे पाठ केली आहे.

- आनंद अंकुश, सचिव, आम आदमी रिक्षा संघटना, पुणे

Web Title: Corona caused a big drop in the number of new rickshaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.