कंपनीने घातली तुटीत भर
By Admin | Updated: July 7, 2015 03:55 IST2015-07-07T03:55:52+5:302015-07-07T03:55:52+5:30
प्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, या एकत्रीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची

कंपनीने घातली तुटीत भर
राजानंद मोरे ल्ल पुणे
प्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, या एकत्रीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस अजूनही अडखळतच धावत आहे. तोट्यात चाललेल्या या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा देणे तर दूरच, अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचाही प्रश्न निर्माण होताना दिसतो. पीएमटी व पीसीएमटीला स्थापनेपासून २००७ पर्यंत झालेल्या ४० ते ५० वर्षांतील संचलन तुटीची सरासरी पीएमपीने २००७ ते १४ या सात वर्षांतच गाठली आहे. त्यामुळे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर ती पांढरा हत्ती ठरत आहे.
एप्रिल २००७ पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र परिवहन उपक्रम चालविले जात होते. पीएमटी व पीसीएमटीच्या बस दोन्ही शहरांतील प्रवाशांना सेवा पुरवीत होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी २००७ मध्ये हे दोन्ही उपक्रम एकत्र करून ‘पीएमपी’ची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यानंतर आजतागायत ‘पीएमपी’ कधीही कंपनी म्हणून उभी राहू शकली नाही. दरवर्षी वाढत जाणाऱ्या तोट्यामुळे ती अधिक कमकुवत होत चालली आहे.
दोन्ही महापालिकांच्या अनुदानाच्या कुबड्यांवरच ‘पीएमपी’ला मार्गावर यावे लागत आहे. पीएमपीतून मिळालेल्या माहितीनुसार, १९५१ ते २००७ या कालावधीत पीएमटीची तूट सुमारे १९६ कोटी २६ लाख रुपये होती, तर १९७४ ते २००७ या कालावधीत पीसीएमटीची तूट ५७ कोटी ७९ लाख रुपये एवढी होती. तर २००६-०७ या वर्षात अनुक्रमे ८४९ व २१२ बस अस्तित्वात होत्या. एप्रिल २००७ मध्ये पीएमपी ही कंपनी अस्तित्वात आल्यानंतर मार्च २०१४ पर्यंत तब्बल २५५ कोटी ३४ लाख रुपयांची तूट आहे. २०१३-१४ मध्ये बसेसची संख्या १४५१ एवढी होती.