शेलपिंपळगाव : मागील दोन दिवसांपासून चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, साबळेवाडी व बहुळ हद्दीत प्रवाशांना प्रचंड कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनांचे अपघात, घाट माथ्यावर बंद पडलेली वाहने, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे व रस्त्यावर वेग नियंत्रण करण्यासाठी टाकलेले रमलर वाहतूक कोंडीचे कारण बनत आहे. रस्त्यावरून चार-पाच किमीचे अंतर जाण्यासाठी अक्षरशः तासभराचा कालावधी लागत असल्याने वाहतूकदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पोलिस प्रशासनाचे वाहतूक कोंडीवर नियंत्रण नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोंडीचा प्रत्यय मागील दोन दिवसांत येत असून, साबळेवाडी ते मोहितेवाडी गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.
चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांची प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोंडीची समस्या कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. चाकण-शिक्रापूर हा रस्ता पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होत असल्याने बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल परराज्यातून घेऊन येणारी अनेक मोठी वाहने सातत्याने प्रवास करत आहेत.
सद्यस्थितीत एकाचवेळी रस्त्यावर शेकडो अवजड वाहने येत आहेत. अरुंद रस्ता कोंडीत अधिक भर घालत आहे. साबळेवाडी वळणालगत बीअर घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. तर बहुळ हद्दीतील घाट रस्त्यावर दोन अवजड वाहने एकापाठोपाठ नादुरुस्त होऊन बंद अवस्थेत भर रस्त्यावर उभी होती. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. त्यात अलीकडच्या काही दिवसांत शेलपिंपळगावही वाहतूक कोंडीचे केंद्र बनत चालले आहे. स्थानिक जनता दररोजच्या कोंडीला कंटाळली असून, सदरची कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.