जेजुरीगडावर रूढीपरंपरांचे व्यापारीकरण
By Admin | Updated: December 18, 2014 04:41 IST2014-12-18T04:41:15+5:302014-12-18T04:41:15+5:30
महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुरातन काळापासून चालत आलेल्या धार्मिक रूढीपरंपरांचे मोठ्या

जेजुरीगडावर रूढीपरंपरांचे व्यापारीकरण
जेजुरी : महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुरातन काळापासून चालत आलेल्या धार्मिक रूढीपरंपरांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होत आहे. देवसंस्थान विश्वस्तांच्या डोळ्यांदेखत भाविकांची होणारी लूट थांबविण्याची मागणी माजी प्रमुख विश्वस्त व माजी नगराध्यक्ष ज्ञानोबा दरेकर यांनी केली आहे.
राज्यातील पंढरपूर, आळंदी, तुळजापूर, नाशिक आणि जेजुरी ही ब्रिटिशकाळापासून अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे मानली जातात. शासकीय पातळीवरून या तीर्थक्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र, जेजुरी वगळता इतर ठिकाणी शिस्त आहे. तशी जेजुरीत नसल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. जेजुरीत यात्राकाळात पोलीस प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन केले जाते, देवसंस्थान मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती असून, देव संस्थानने प्रामुख्याने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुख्य मंदिरातील सभामंडप आणि गडकोटातील बालद्वारी मंडपाला पावसाळ्यात गळती होते. मुख्य मंदिरातील सभामंडपाच्या छताच्या दगडी तुळर्इंना चिरा पडलेल्या आहेत. त्यांची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास विश्वस्त मंडळ व त्यांचे प्रशासनच जबाबदार राहणार असल्याने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचे व गडकोटाचे जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाची आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाहणी करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे दरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)