कामांना आचारसंहितेचा अडथळा
By Admin | Updated: May 22, 2014 06:10 IST2014-05-22T06:10:44+5:302014-05-22T06:10:44+5:30
आचारसंहितेमुळे विकासकामांना खिळ बसू नये, यासाठी ८०० कोटींच्या विकासकामांच्या निविदा काढून, तातडीने कामाचे आदेश देण्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी नियोजन केले होते.

कामांना आचारसंहितेचा अडथळा
पिंपरी : आचारसंहितेमुळे विकासकामांना खिळ बसू नये, यासाठी ८०० कोटींच्या विकासकामांच्या निविदा काढून, तातडीने कामाचे आदेश देण्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी नियोजन केले होते. निविदा काढण्याची घाई केली असताना, निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला. आचारसंहितासुद्धा लागू झाली. त्यामुळे आयुक्तांनी विकासकामांच्या निविदा प्रक्रियेची केलेली घाई निष्फळ ठरली. निविदा काढून कामाचे महापालिका आयुक्तांनी सुमारे सातशे विकास कामे पूर्ण करण्यासाठी घाई-गडबडीने निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. परंतु राज्यातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता अचानक लागली आहे. त्यामुळे आयुक्तांना करावयाच्या या विकास कामांना आणखी महिनाभरासाठी खिळ बसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच महापालिका आयुक्त जाधव यांनी प्रभाग स्तरावर बैठका घेऊन कामांचे नियोजन केले होते.अर्धवट कामांचा आढावा घेतला होता. स्थापत्य आणि मलनि:सारण विभागाची सुमारे ८०० कोटींची काम करण्याचे त्यांनी नियोजन केले होते. प्रभाग स्तरावर १० लाखाच्या खालच्या ४० कामांच्या तर १० लाखाच्या वरील रकमेच्या ७०० कोटींच्या निविदा काढण्याची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यान्वित केली होती. १० जूननंतर आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांनी लवकरच निविदा काढणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले होते. त्यांचा अंदाज चुकला.(प्रतिनिधी)