नागरी उपद्रवाची पोलिसांनाही डोकेदुखी

By Admin | Updated: May 19, 2014 00:45 IST2014-05-19T00:45:09+5:302014-05-19T00:45:09+5:30

शहराच्या अफाट वाढलेल्या पसार्‍यात रस्त्यांवरच्या गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे

The civilian nuisance of the police is also a headache | नागरी उपद्रवाची पोलिसांनाही डोकेदुखी

नागरी उपद्रवाची पोलिसांनाही डोकेदुखी

पुणे : शहराच्या अफाट वाढलेल्या पसार्‍यात रस्त्यांवरच्या गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. मद्याच्या नशेत भांडणे, हाणामार्‍या, अपरात्री फटाके फोडणे, कर्कश आवाजात लाऊडस्पीकर लावणे, वाहनांची मोडतोड अशा स्वरूपाच्या तक्रारी पोलीस नियंत्रण कक्षाकडे रात्री आठ ते बारा या वेळेत सर्वाधिक होताना दिसतात. शहराची हद्द वाढत गेल्यानंतर वस्ती प्रचंड वाढली. मानवी कलहांचे प्रमाणही वाढले आहे. पोलिसांची पूर्वीसारखी जरब राहिलेली नसल्याने मनमानी करणार्‍या प्रवृत्तींचे फावले आहे. विशेषत: गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भर रस्त्यांत हाणामार्‍या करण्याचे, मद्यपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक मद्याच्या दुकानांसमोर सकाळपासून रात्रीपर्यंत मद्यपींची वर्दळ असते. नशेतून त्यांच्या भांडणांचे प्रकार होतात. पर्वती कालव्याच्या मोकळ्या जागी रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे अड्डे जमलेले असतात. वेताळ टेकडीसह अनेक डोेंगरांवर मद्यपींची लगबग असल्याची उदाहरणे आहेत. भुरट्या चोरांनी भर रस्त्यात लूटमार करण्याचे प्रकारही होतात. ‘बोलबच्चन’ नामक टोळी बाहेरगावांहून आलेल्या एकाकी प्रवाशांना किंंवा स्थानिक नागरिकांना लुटते. मंगळसूत्र किंंवा सोनसाखळ्या खेचणार्‍यांना पोलिसांना चाप लावता आलेला नाही. भरदिवसाही असे प्रकार होत आहेत. नागरिकांमध्ये आत्मकेंद्रित वृत्ती असली तरी टोळक्यांमधील भांडणे, हाणामार्‍या, मद्याच्या नशेत धुडगूस, अपरात्री कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त किंंवा अन्य कोणत्या तरी सेलिब्रेशनसाठी फटाके फोडणे अशा प्रकारांमुळे असह्य मनस्ताप होऊ लागल्यावर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली जाते. अशा घटनांचा मागोवा घेण्यासाठी पोलीस जातात, मात्र ते पोहोचेपर्यंत घटनास्थळी सामसूम असते. अनेक प्रकारांमध्ये पोलीस वेगवान कारवाई करून दखल घेतात. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अशा प्रकारांमध्ये किती आरोपींवर कारवाई केली गेली, याची आकडेवारी पोलिसांकडे नाही. अलीकडे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवरचे सशस्त्र कमांडो असल्याने काही वेळातच घटनास्थळी पोलीस पोहोचतात, तरीही नागरी उपद्रवांचे प्रमाण चिंंताजनक आहे. उपनगरांमध्येच नव्हे मध्यवर्ती भागातही पहाटे एक ते दीडच्या सुमारास दणदणाटी फटाके फोडले जातात. रात्रपाळीला असलेल्या गस्तीवरच्या पोलिसांनी स्वत: होऊन अशा प्रकारांमध्ये कारवाई केल्याचे दिसून येत नाही. नागरिकांनी नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्यानंतरच दखल घेतली जाते. मात्र, आपले नाव उघड होऊन त्रास होईल, या भीतीने थेट पोलिसांकडे तक्रारी करण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यामुळे रात्री दहानंतर फटाके फोडणार्‍यांवर किती खटले केले गेले, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. मद्याच्या नशेत दोन टोळक्यांमध्ये होणार्‍या हाणामारीचे पर्यवसान दगडफेकीत, वाहनांची नासधूस करण्यात होते. कोथरूड, धनकवडी भागात असे प्रकार वारंवार होत आहेत. उपद्रवी टोळक्यांकडून सोसायट्यांतील वाहनांना आगी लावण्याचे प्रकार वाढत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The civilian nuisance of the police is also a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.