वृक्षांच्या कत्तलीविरोधात नागरिक रस्त्यावर
By Admin | Updated: December 6, 2015 03:18 IST2015-12-06T03:18:55+5:302015-12-06T03:18:55+5:30
मनात आणले तर जनशक्ती काय करू शकते, याचे प्रत्यंतर वैकुंठ मेहता संस्थेच्या आवारातील आयसीएस कॉलनी व भोसलेनगरमधील रहिवाशांनी शनिवारी दिले. संस्थांतर्गत रस्त्याच्या

वृक्षांच्या कत्तलीविरोधात नागरिक रस्त्यावर
पुणे : मनात आणले तर जनशक्ती काय करू शकते, याचे प्रत्यंतर वैकुंठ मेहता संस्थेच्या आवारातील आयसीएस कॉलनी व भोसलेनगरमधील रहिवाशांनी शनिवारी दिले. संस्थांतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हजारो वृक्षांचा बळी घेण्याच्या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. वयोवृद्ध नागरिक, तसेच शालेय मुलेही यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शेजारी ही संस्था आहे. संस्थेने अंतर्गत रस्त्यावर शेकडो वृक्ष लावले आहेत. परिसरात असलेल्या एका टेकडीवर स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून हिरवाई निर्माण केली आहे. रस्त्याच्या अगदी टोकाला नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधील मूठभर नागरिकांच्या सोयीसाठी संस्थेच्या मालकीचा हा रस्ता रुंद करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. त्यात या सगळ्या वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालवली जाईल. त्याचा विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आज महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली.
शेकडो नागरिक यात सहभागी झाले होेते. एकही झाड पाडू देणार नाही, रस्ता रुंदीकरण नकोच, काव काव काव एक तरी वृक्ष लाव, अशा अनेक घोषणा देण्यात येत होत्या. स्थानिक नगरसेवक राजू पवार, पालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य अमेय जगताप, वैकुंठ मेहता संस्थेचे प्रमुख आयपीएस संजीव पटजोशी आदी अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा असलेले फलक हातात घेऊन सर्व नागरिक अत्यंत शिस्तीने रस्त्याच्या एका कडेला उभे राहून घोषणा देत होते. वाहतूक अडवणार नाही, असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. वैकुंठ मेहता संस्थेतील विद्यार्थीही गणवेशात यात सहभागी झाले होते.
महिला, विद्यार्थी, तसेच वयोवृद्ध नागरिक यांचा निदर्शनांमधील उत्साह लक्षणीय होता. त्यांच्यापैकी अनेकांनी हे वृक्ष म्हणजे आमचे सगेसोयरे असल्याची भावना व्यक्त केली. मोहल्ला समितीच्या माध्यमातून ही निदर्शने आहेत, नावे कोणाचीही नकोत, असे सगळेच आवर्जून सांगत होते. नगरसेवक पवार यांनी पालिकेने काही विशिष्ट व्यावसायिकांच्या आग्रहावरून हे कारस्थान रचले आहे, असा आरोप केला. मालकीच्या नसलेल्या रस्त्यावर पाच पैसेही खर्च करता येत नसताना पालिकेने या रस्त्यावर कॉँक्रीटीकरणासाठी काही कोटी रुपयांचा खर्च केला आहे,असे ते म्हणाले.प्रशासनाला याचे उत्तर द्यावेच लागेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पालिकेची ही मनमानी अत्यंत वाईट आहे. जगभर झाडे वाचवण्याचा प्रयत्न होत असताना इथे मात्र त्यावर कु्ऱ्हाड चालवली जात आहे. त्याचा प्रतिकार करावा म्हणून आम्ही यात सहभागी झालो आहोत.
-आर. एस. उपाध्याय व सुजाता उपाध्याय, सहभागी वृद्ध दांपत्य