कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: May 19, 2014 00:04 IST2014-05-19T00:04:58+5:302014-05-19T00:04:58+5:30
बारामती शहरालगत असलेल्या जळोची हद्दीतील अंबिकानगर या भागातील नागरिकांना कचरा डेपोतील कचरा अवेळी पेटविल्याने त्रास सहन करावा लागत आहे

कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त
बारामती : बारामती शहरालगत असलेल्या जळोची हद्दीतील अंबिकानगर या भागातील नागरिकांना कचरा डेपोतील कचरा अवेळी पेटविल्याने त्रास सहन करावा लागत आहे. कचरा डेपो काही घरांच्या लगत आहे. हा कचरा अवेळी पेटविला जातो, त्यामुळे धुरांचे अक्षरश: लोट तयार होतात. या धुरांच्या लोटांमुळे रस्त्यावर जाणार्या-येणार्यांना रस्ताही दिसेनासा होतो, यामुळे नागरिकांना घरांचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतात. सुक्या, ओल्या कचर्यामुळेही नागरिकांना घरांचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतात. लहान मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. काहींना आजारी पडण्याचा धोका संभवतो. वृद्ध व्यक्तींना श्वसनाचे आजार होण्याचा धोका आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. अंबिकानगरचा रस्ता हा एक प्रकारचा जॉगिंग ट्रॅक बनला आहे; परंतु नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सकाळी व्यायामाला बाहेर पडणेही येथील नागरिकांनी सोडून दिले आहे. जे काही व्यावसायिक या परिसरात राहतात, त्यांच्या व्यवसायावर याचा परिणााम होत आहे. कचरा अवेळी पेटविला गेला तर नागरिकांना आपली दुकाने बंद करून घ्यावी लागत आहेत, याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसत आहे. अंबिकानगर हे सर्व दृष्ट्या सोईस्कर आहे. व्यावसायिक व उद्योजकांची संख्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अठरा ते वीस वर्षांपासून ही समस्या सुरू आहे; परंतु नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. अंतर्गत रस्ते, बाह्य रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सातत्याने नागरिकांनी पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या परिसरातील रहिवासी रश्मी शॉपीचे विशाल टाटिया यांनी सांगितले, की या परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली होती. मात्र, काहीही परिणाम झाला नाही. या परिसरात हेल्थ क्लब व जिम आहेत. ते या समस्येला त्रासले आहेत. हेल्थ क्लब व जिमसारख्या आरोग्यासाठी सुविधाजनक गोष्टी या परिसरात आहेत. मात्र, कचर्याच्या समस्येमुळे नागरिक याचा उपभोग घेऊ शकत नाहीत. ‘विनसम जिम’ व त्याचप्रमाणे ‘कोर जिम’ या परिसरात आहे. आरोग्यासाठी हानिकारक कचरा या परिसरातून हलविण्यात यावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मंगळसूत्र चोरीचे प्रमाणही या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांसाठी सुरक्षित असा हा परिसर नाही, याची दखल घेण्यात यावी. कचरा डेपो पेटविण्याच्या विरोधात नागरिकांनी मोर्चाही काढला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत कचरा पेटविला जातो, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)