चाकणला ‘जमीनमुक्ती’साठी लढा!

By Admin | Updated: December 7, 2015 00:17 IST2015-12-07T00:17:46+5:302015-12-07T00:17:46+5:30

चाकणच्या ‘त्या’ सात गावांतील जमिनीवर विमानतळासाठी राखीव म्हणून शिक्के असताना पुन्हा याच जमिनीवर औद्योगिक वसाहत फेज ५ करीता आरक्षणाच्या नोटीसी काढण्यात

Chakan fight for 'emancipation' | चाकणला ‘जमीनमुक्ती’साठी लढा!

चाकणला ‘जमीनमुक्ती’साठी लढा!

पुणे/ आंबेठाण : चाकणच्या ‘त्या’ सात गावांतील जमिनीवर विमानतळासाठी राखीव म्हणून शिक्के असताना पुन्हा याच जमिनीवर औद्योगिक वसाहत फेज ५ करीता आरक्षणाच्या नोटीसी काढण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनात उतरली असून खेडप्रमाणे येथील शिक्के काढण्यासाठी आंदोलन करणार आहेत.
येथील आंबेठाण, गोनवडी, वाकी खुर्द, रोहकल आणि बिरदवडी आदी सात गावांतील तब्बल २००० हजार एकर बागायती जमीन भूसंपादनच्या नावाखाली अधिग्रहित करण्यासाठी २००२ पासून राखीव करण्यात आली आहे. आधी विमानतळाच्या नावाखाली शिक्के पडले. मात्र २००५ सालीच सदर जमीन विमानतळ प्राधिकरणाने फेटाळली. मात्र त्या जमिनीवरील शिक्के शासनाद्वारे काढले नाहीत.
यामुळे सर्व शासकीय योजनांच्या लाभापासून येथील शेतकरी वंचित राहिला. स्वत:च्या हक्काच्या जमिनी असताना साधी विहीर खोदण्यास त्याला मनाई आहे.
नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जया शेट्टी यांनी बोरदरा (ता. खेड) येथे शेतकऱ्यांची बैैठक घेतली. या वेळी जर या ठिकाणी बळजबरीचा वापर करून जमीन संपादनाचा प्रयत्न केला तर चोख उत्तर दिले जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना या भागातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आह. एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता स्वाभिमानी संघटनेने चाकणच्या त्या सात गावांची ‘जमीनमुक्ती’ करण्याचा निर्धार केला आहे.
संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी, खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले जाईल, असे सांगितले. याकरिता लवकरच तिथे मोठा शेतकरी मेळावा आयोजित केला जाईल. (प्रतिनिधी)
1खेड तालुक्यात एमआयडीच्या पाचव्या टप्प्यासाठी आंबेठाण, गोनवडी, वाकी खुर्द, रोहकल, आणि बिरदवडी या पाच गावामधील ७७८ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. सध्या खेड तालुक्यात एमआयडीचे चार टप्पे झाले असून हे सर्व चाकण परिसराच्या पश्चिम आणि दक्षीणभागात झाले आहेत. नव्याने पाचवा टप्पा हा चाकणच्या उत्तर-पश्चिम भागात येणार असल्याने निम्मे चाकण शहर हे एमआयडीने वेढले जाणार आहे. 2खेड तालुका हे एक कुटुंब आहे आणि आता या कुटुंबात साप निघाला आहे. हा साप मारण्यासाठी आपणास राजू शेट्टी या पाहुण्यांची काठी घ्यावी लागत आहे. कारण, आपल्या घरातील लोक मूग गिळून गप्प आहेत. त्यांना आपल्या कुटुंबाचे काहीही देणे-घेणे नाही. फक्त मतापुरते यायचे आणि हेतू साध्य करून घ्यायचा, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

Web Title: Chakan fight for 'emancipation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.