चैतन्यमय पर्वाला आज प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 02:56 IST2015-09-17T02:56:05+5:302015-09-17T02:56:05+5:30
गेल्या दीड महिन्यापासून पावसाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या पुणेकरांबरोबर जिल्हा व राज्यातील नागरिकांना निसर्गाने गेल्या काही दिवसांपासून दिलासा दिला आहे़

चैतन्यमय पर्वाला आज प्रारंभ
पुणे : गेल्या दीड महिन्यापासून पावसाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या पुणेकरांबरोबर जिल्हा व राज्यातील नागरिकांना निसर्गाने गेल्या काही दिवसांपासून दिलासा दिला आहे़ जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची कृपादृष्टी झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे़ त्याचबरोबर येत्या काही दिवसांत हा पाऊस असाच राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे़ निसर्गाच्या या कृपाप्रसादामुळे सर्वांचाच उत्साह वाढला असून, गुरुवारपासून गणेशात्सवाच्या चैतन्यमय पर्वाला सुरुवात होत आहे़ वर्षभराच्या चिंता काही दिवस दूर ठेवून भक्तांनी श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी केली असून, गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत़
गणेशोत्सवाला गुरुवारी प्रारंभ होत असून, श्रींची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी आज शनिवारवाड्याजवळील स्टॉलवर नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती़ येथे भाविक आपल्या कुटुंबासहीत दुचाकी व चारचाकी
वाहने घेऊन गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी आलेले
होते. तेथील नागरिक रस्त्याच्या कडेला उभ्या
नयनरम्य रूपातील, विविध व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरित झालेल्या गणेशमूर्तीच्या खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असताना पारंपरिक पद्धतीने तयार झालेल्या गणपतींकडे सुद्धा दुर्लक्ष झालेले नाही. कसबा पेठ व शनिवारवाडा परिसरातील विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पारंपरिक पद्धतीने तयार झालेले दगडूशेठ गणपतींनाही भाविकांची चांगली मागणी आहे.
दर वर्षाला प्रसिद्ध होणाऱ्या चित्रपट, तसेच मालिकांचा संदर्भ घेऊन गणेशमूर्ती तयार करण्याची पद्धत तशी जुनीच आहे. बालचिमुकल्यांचा व तरुणांना आकर्षित करून व्यवसायाची उलाढाल वाढवणे हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. या वर्षी बाहुबली हा दाक्षिणात्य चित्रपट व जयमल्हार ही मराठी मालिका बरेच गाजले होते. त्यामुळे पुण्याच्या गणेशमूर्ती विक्रेत्यांनी विनंती करून अशा रूपातले गणेशमूर्ती, तसेच पेण, कोल्हापूर, नगर या भागातून परंपरेनुसार चालत आलेल्या गणेशमूर्तीही त्यांनी मागवून घेतल्या. पण, त्यांना या मूर्तींचा व्यवसाय होईल, अशी शाश्वती नव्हती.
शाडूच्या मूर्तीची तितकीशी चलती नसते़ त्याबरोबर शाडूच्या मूर्तींना वेळ व खर्चही जास्त लागतो़ त्याप्रमाणे मोबदला मिळत नसल्याची खंत विक्रेते विनायक कुंभार यांनी व्यक्त केली़ दुष्काळाचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमतीवरही झाला असून, किमतीत ३० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेते राहुल कुंभार यांनी सांगितले़
गणपतीला आवडणारे मोदक हा चतुर्थीतील मुख्य नैवेद्य असतो़ मोदकासाठी लागणाऱ्या वस्तूची तयारी करण्यात महिलावर्ग गुंतला होता़ तर, घरच्या गणपतीच्या आरास तयार करण्यात विद्युत रोषणाई करण्यात तरुण मग्न होते़
पुणे शहराचे वैभव असलेल्या गणेशोत्सवाला गुरुवारी सुरुवात होत असून, बहुतेक सार्वजनिक मंडळे श्रींची प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीने करणार आहेत़ त्यासाठी मिरवणूक रथाच्या तयारीवर अंतिम हात फिरविण्याची लगबग सुरू होती़ श्रीला घरी आणण्यासाठी सहकुटुंब ताम्हण, निरांजन, घंटी घेऊन श्रींच्या स्टॉलवर आलेले दिसत होते़ शनिवारवाड्यासभोवती उभारण्यात आलेल्या स्टॉलवर गर्दी झाली होती़ तसेच उपनगरातील विविध स्टॉलवर बालगोपाळांच्या पसंतीने श्रींच्या मूर्तीची निवड केली जात होती़ त्यानंतर मूर्ती ताम्हणात ठेवून त्यावर अक्षता वाहून ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत घराकडे रवाना होत होते़ याच वेळी श्रींची मूर्ती घेण्यासाठी येणाऱ्यांनी दिलेल्या ‘गणपती बाप्पा’ घोषणेला मोरया म्हणून प्रतिसाद दिला जात होता़
घरगुती गणपतीबरोबर लहान मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीच्या खरेदीसाठी या ठिकाणी येताना दिसत होते़ जमलेली वर्गणी व मूर्तीच्या किमतीचा अंदाज घेऊन कोणती पसंत करावी, याचा खल या छोट्या मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत होते़
प्राणप्रतिष्ठेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केल्यानंतर त्याची मांडणी करणे, प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजींनी दिलेल्या वेळीच ते येणार का, याची चौकशी केली जात होती़
काही जणांनी तर आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन येण्याचा उत्साह दाखवला. एकंदरीतच ज्या असीम उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकर प्रसिद्ध आहेत तो उत्साह या वर्षीही तेवढाच टिकून आहे.
श्रींच्या मूर्तीच्या खरेदीसाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे कसबा पेठेतील गल्लीबोळात वाहतूककोंडी झाली होती़ वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली होती आणि परिस्थिती त्यांच्याही हाताबाहेर गेली होती़ मात्र, त्याही स्थितीत गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांनी गणपती बाप्पा असा आवाज दिल्यावर मोरया म्हणत त्यांना प्रतिसाद दिला जात होता़
कसबा पेठेत जमलेले भाविक आपल्या घरातील लहानग्यांच्या इच्छेनुसारच गणेशमूर्ती खरेदी करण्यावरच भरत देत होते. बाहुबली, जयमल्हार यांची क्रेझ तर होतीच, पण त्याबरोबरच लहानग्यांचे नेहमीच्या सोबतीतले छोटा भीम रूपातील गणेशमूर्तींचा व्यवसायही चांगला होत होता. पारंपरिक मराठी पोषाख व आपापली वाहने घेऊन भाविक गणेशमूर्ती खरेदी करीत होते.
जवळपासच्या सर्व मूर्तीविक्रेत्यांनी बाहुबली, जयमल्हार व इतर मूर्ती मागवल्या़ आमचाही सुरुवातीला तोच विचार होता, पण नंतर परंपरेने चालत आलेल्या गणेशमूर्ती ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि व्यवसायही विश्वास न बसण्यासारखा झाला.
- निजामपूरकर,
विक्रेते