पुणे: शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर, पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोनवेळा अतिक्रमण विभागाचे प्रमुख बदलले, अतिक्रमण निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच राहिली. आता महापालिकेला नवलकिशोर राम हे नवीन आयुक्त मिळाले आहेत. आता नवीन आयुक्त तरी हे चित्र बदलून शहर अतिक्रमणमुक्त करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क आकारून फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, महापालिकेकडून कसलाही परवाना न घेता, राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून शहरातील पदपथ व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून व्यवसाय थाटण्यात आलेली आहेत. यातून शहरात प्रवेश करणारे रस्तेही सुटलेले नाहीत. शहरात येणाऱ्या रस्त्यांना पदपथ असतानाही फळे, भाज्या व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो, हातगाड्या रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करतात. वाहनचालक व दुचाकीस्वार रस्त्यावरच आपल्या गाड्या थांबवून अशा व्यावसायिकांकडे खरेदी करतात. यामुळे शहरात येणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होते.
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्यानंतर काही दिवस कारवाईचा दिखावा झाला. त्यानंतर काही दिवसांतच कारवाई थंड होऊन अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई व्हावी, अधिकारी व व्यावसायिकांच्या संगनमताची साखळी तुटावी, यासाठी दोनवेळा अतिक्रमण विभागाचे प्रमुख बदलले, अतिक्रमण निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. आता महापालिकेचे नवीन आयुक्त नवलकिशोर राम हे तरी शहर अतिक्रमणमुक्त करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.