ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकाचा विकास खोळंबला
By Admin | Updated: April 16, 2017 03:53 IST2017-04-16T03:53:11+5:302017-04-16T03:53:11+5:30
खंडोबागडामुळे संपूर्ण देशात तीर्थक्षेत्र म्हणूण असलेली ओळख, भविष्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास झपाट्याने होणार आहे. विकासाच्या

ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकाचा विकास खोळंबला
जेजुरी : खंडोबागडामुळे संपूर्ण देशात तीर्थक्षेत्र म्हणूण असलेली ओळख, भविष्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास झपाट्याने होणार आहे. विकासाच्या या टप्प्यात रस्ते मार्गाबरोबरच रेल्वेमार्गाचाही विस्तार होणे गरजेचे आहे. मात्र, ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानक कित्येक दशकांपासून विकासापासून वंचित राहिले आहे. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात अनेकदा या स्थानकासाठी निधी मंजूर होऊनही तालुक्यातील या महत्त्वाच्या स्थानकाचा विकास रखडला आहे.
महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींचे जेजुरीचा खंडोबा हे आराध्यदैवत असल्याने राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला येण्यासाठी रेल्वेमार्ग सोयीचा आणि कमी खचार्चा आहे. तीर्थक्षेत्राचे महत्त्व ओळखूनच ब्रिटिशांनी जेजुरीला रेल्वे स्टेशन उभारले. स्वातंत्र्यानंतर मात्र या रेल्वे स्टेशनकडे प्रशासनाचे दुर्लक्षच झालेले आहे. तत्कालीन आमदार अशोक टेकवडे यांनी या रेल्वे स्थानकाकडे कडे लक्ष देऊन येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या ठिकाणी रेल्वेचा मालधक्का, रेल्वे स्थानकातून रूळ ओलांडून पलीकडे जाण्यासाठी व येण्यासाठी ओव्हरब्रिज नसल्याने नागरिक व प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ ओलांडावा लागतो. या स्थानकाचा पायाभूत विकास व्हावा तसेच ओव्हरब्रिज, पिण्याचे स्वछ पाणी, कूलर, विश्रामगृह, फलाटाची उंची वाढवणे, तसेच पुणे ते लोनंद लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. स्थानिक तत्कालीन नगरसेवक मेहबूब पानसरे, संजय माने, रोहिदास कुदळे, विजय खोमणे, संदीप होले आदींनी याबाबत सतत पाठपुरावा केला होता. प्रशासनानेही प्रतिसाद देऊन या विकासकामांना सुरुवात केली होती. रेल्वेरूळ ओलांडण्यासाठी ओव्हरब्रिज आणि मालधक्क्याचे काम सुरू करण्यात आले. मालधक्का पूर्ण झाला. ब्रिजचे कामही पूर्ण झाले; मात्र राजकीय वादात येथील मालधक्का मात्र बंद झाला. आज त्याची दुरवस्थाच झालेली आहे.
उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वेमार्ग असून या मार्गावरून दररोज २० रेल्वेगाड्यांची ये-जा होत असते. मात्र, या गाड्यांना या ठिकाणी थांबा नाही. वास्तविक, तीर्थक्षेत्र जेजुरीला येणारे भाविक राज्याबाहेरूनही येतात. त्यांना रेल्वे सोयीची असूनही या गाड्या येथे थांबत नसल्याने पुणे वा सातारा येथे उतरून एसटी बसने येथे यावे लागते. या सर्वच गाड्या येथे थांबणे आवश्यक आहे. ज्या गाड्या येथे थांबतात, त्याही केवळ एकच मिनीट. त्या किमान २ मिनिटे थांबाव्यात, अशी स्थानिकासह येथे येणाऱ्या भाविकांची मागणी आहे.
रेल्वे प्रशासनाकडून पूर्णत: दुर्लक्षित केले गेलेले हे स्थानक आहे. याचा विकास झाल्यास रेल्वे प्रशासनाला मोठे उत्पन्न मिळू शकते. याचा विचार करून येथील दोन्ही फ्लॅटफॉर्मची उंची वाढविणे गरजेचे आहे. येणाऱ्या गाड्या ज्या फलाटावर थांबतात तो क्र. १ चा प्लॅटफॉर्म अत्यंत कमी उंचीचा असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालावा लागतो. यामुळे या ठिकाणी अपघातही झाले आहेत. प्लॅटफॉर्म क्र.१ साठीच शेड आहे. त्याची लांबी ही केवळ ७२ फूट असल्याने उन्हाळ्यात व पावसाळ्यात प्रवाशांचे खूप हाल होतात. प्रवाशांना थांबण्यासाठी अगदी छोटेसे प्रतीक्षालय आहे. तेही केवळ फर्स्ट क्लास तिकीट धारकासाठीच आहे. ब्रिटिशांनी बांधलेली इमारत आजही तशीच आहे. केवळ इमारतीची रंगरगोटी केली जात असून, जुन्या इमारतीच्या जागेवर नवी इमारती होणे गरजेचे बनले आहे.
1 तीर्थक्षेत्र जेजुरी हे महाराष्ट्रातील खंडोबाभक्तांचे आराध्य दैवत आहे. तीर्थक्षेत्रात शासकीय पातळीवरून वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. जेजुरी देवसंस्थानाला शासनाकडून दर वर्षी मोठा निधी उपलब्ध होत असल्याने एकीकडे तीर्थक्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. शहर वाढते आहे. लगतच एमआयडीसी असल्याने कारखानदारी वाढत आहे. यामुळे लोकसंख्येबरोबरच चाकरमान्यांची संख्याही वाढतच आहे.
2 मुख्य शहरापासून १ किलोमीटर अंतरावर असणारे हे स्टेशन आता लोकसंख्यावाढीमुळे ते शहरालाच जोडले गेले आहे. या परिसरात लोक वसाहत ही निर्माण होत आहे. या परिसरात लोकांची वसाहत वाढण्यास अनुकूल परिस्थिती असल्याने रेल्वेकडून या परिसराची पाहणी करून एक आराखडा बनवणे आवश्यक आहे. प्रवाशांची, चाकरमान्यांची संख्या वाढावी म्हणून रेल्वेने पावले उचलताना येथे येणाऱ्या भाविकांसाठी एखादे भक्तनिवास उभे केले, तर रेल्वेचे उत्पन्न वाढेल.
3 ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन असल्याने तेथे तेव्हाच्या परिस्थितीनुसार स्टेशनची रचना आहे. आज परिस्थिति वेगळी आहे. आज येथे दररोज कमीत कमी ४०० प्रवासी उतरतात. दररोज कमीत कमी ३०० प्रवासी प्रवासाची तिकिटे खरेदी करतात. येथे तिकीटविक्रीची सुविधा ही अत्यंत साधारण आहे. दररोज येणाऱ्या प्रवाशांव्यतिरिक्त यात्राकाळात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. यात्राकाळात १० ते १५ हजार भाविक येत असतात. तीर्थक्षेत्र असल्याने वर्षाकाठी येथे ८ यात्रा भरतात.
4 सुमारे सव्वा लाखापेक्षा जास्त भाविक वर्षाकाठी रेल्वेने येथे येत असतात. त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. या भाविकासाठी असणारी तिकीटविक्रीची यंत्रणा आधुनिक असायलाच हवी. तिकीट विक्री, आरक्षण यासाठी एकाच कर्मचारी असल्याने त्याला चालू तिकीटविक्री, सामान तिकीटविक्री आणि आरक्षण करावे लागत. एकाच काऊंटरमुळे हे काम करताना अडचणीच येत आहेत. किमान दोन कर्मचारी व काऊंटर असावेत.