कालव्यालगतचा वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: April 29, 2017 03:54 IST2017-04-29T03:54:31+5:302017-04-29T03:54:31+5:30
पूर्व हवेलीतून वाहणाऱ्या नव्या मुळा-मुठा कालव्यालगतच्या तसेच बेबी कालव्यालगतच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा पाणीचोरी थांबविण्यासाठी खंडित करण्यात आला आहे.

कालव्यालगतचा वीजपुरवठा खंडित
उरुळी कांचन: पूर्व हवेलीतून वाहणाऱ्या नव्या मुळा-मुठा कालव्यालगतच्या तसेच बेबी कालव्यालगतच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा पाणीचोरी थांबविण्यासाठी खंडित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बी. व्ही. साब्दे व पाटबंधारे विभागाच्या उरुळी कांचन शाखा अभियंता शशिकांत काळे यांनी दिली. तरीही काही शेतकरी अन्य प्रकारे पाणीचोरीचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर व त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कडक कारवाई करणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.
खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन २० एप्रिल ते ५ जून २०१७ पर्यंत सोडण्यात येत असून सध्या सुमारे १६०० क्युसेक्स डिस्चार्जने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र ‘टेल टू हेड’ पाणीवाटप धोरणानुसार कालव्याच्या शेवटी असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी सर्वात आधी पाणी दिले जाणार आहे. मात्र हवेली व दौंड तालुक्यातील शेतकरीवर्गाकडून तीव्र उन्हाळ्यात पिकांना कमी पडणाऱ्या पाण्याची भूक भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कालव्याचे पाणी चोरून उचलले जात असल्याने कालव्याच्या शेवटी पाणी पोहोचत नसल्याचे कारण देत परिसरातील शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे जनावरांसाठीचा चारा, भाजीपाला व इतर पिके पंधरा दिवसांपर्यंत तग धरणे कठीण असते. त्यातच कालव्याला पाणी असूनदेखील शेतीसाठी त्याचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पाणी चोरीची प्रवृत्ती बळावत असून ते कारवाईची भीती बाळगत नसल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)