झाडांच्या मुळांवरच हल्ला
By Admin | Updated: May 19, 2014 00:31 IST2014-05-19T00:31:24+5:302014-05-19T00:31:24+5:30
वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील पर्यावरणाचा -हास होत असून झाडांची संख्या कमी होण्यावर त्याचा परिणाम होत आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही

झाडांच्या मुळांवरच हल्ला
पुणे : वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील पर्यावरणाचा -हास होत असून झाडांची संख्या कमी होण्यावर त्याचा परिणाम होत आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही. मात्र, शहरातील झाडांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी गणेश कला-क्रीडा केंद्र येथे अचानक मुळापासून उन्मळून पडलेल्या झाडाला मुळ्याच नसल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे कोणीतरी हे झाड काढण्यासाठी जमिनीतील मुळ्या कापून ठेवल्या असल्याची शंका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत झाड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फक्त पावसाळ्यातच नव्हे तर, उन्हाळ्यातही या घटनांची संख्या दखल घेण्याजोगी आहे. वाढते प्रदूषण आणि जमिनीची होणारी धूप, यातच मुळांना वाढण्यासाठी अपुरी जागा यामुळे झाडांना पोषणमूल्ये मिळत नाहीत. बांधकामांमध्ये झाडांसाठी काही जागा संरक्षित केली जाते. मात्र, झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुळ्या वाढण्यासाठी जमिनीखालीही माती नसते. तो भागही सिमेंटने बंद झालेला असतो. काही वर्षांपूर्वी अशाप्रकारे दिल्लीत फुटपाथवरील झाडांच्या वाढीसाठी पर्यावरणप्रेमींनी मोहीम सुरू केली होती. त्यांनी हे फुटपाथ उखडून त्या ठिकाणी नव्याने झाडे लावली होती. झाडांच्या वाढीला अशाप्रकारे जमिनीत मर्यादा पडू लागल्यास पुण्यातही नव्याने वृक्षारोपण सुरू करावे लागेल, असे मत वृक्ष संगोपन संशोधक महेश कदम यांनी व्यक्त केले. हिरवे झाड उन्मळून पडत नाही. जोपर्यंत त्यांच्या मुळांना धक्का लागत नाही, तोपर्यंत झाड मजबूत असते. मात्र, वादळ-वारा-वीज नसताना हे झाड पडले. या जमिनीच्या बाजूला खाणकाम केलेले असावे. झाडाची दुरवस्था झाली असल्यास सुरुवातीला झाडाच्या फांद्या किंवा वठलेला भाग पडतो. मात्र, असे काहीही नसताना पडलेल्या झाडासंदर्भात महापालिकेने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी वृक्षप्रेमी विनोद जैन यांनी केली.