लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:38+5:302021-01-08T04:33:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्ट्यासाठी दिल्लीहून आणलेल्या सुमारे १२० कोटी रुपयांचा ३४ किलो चरस ...

लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्ट्यासाठी दिल्लीहून आणलेल्या सुमारे १२० कोटी रुपयांचा ३४ किलो चरस लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला होता. या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला आहे. लोहमार्ग पोलिसांबरोबरच आता याचा तपास दहशतवाद विरोधी पथक करणार आहे. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या तपासात अनेक धागेदोरे मिळाले असून त्यात बॉलीवूडचे कनेक्शन असल्याचे आढळून आल्याचे समजते.
हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यात आलेले हे अमली पदार्थ पुण्यासह मुंबई, गोवा, नागपूर, बंगलोर या शहरातील पब, हॉटेलमध्ये नववर्षाच्या पाट्रीमध्ये विकला जाणार होता. त्यापूर्वीच पुणे लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून ३४ किलो चरस जप्त केला होता.
याबाबत लोहमार्गचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, एकापेक्षा अधिक जिल्ह्यात जर गुन्ह्याची व्याप्ती असेल तर त्याचा तपास सीआयडीकडे दिला जातो. त्याप्रमाणे अमली पदार्थाच्या गुन्ह्याची व्याप्ती २ पेक्षा अधिक जिल्ह्यात असेल तर त्या त्या राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाकडे त्याचा तपास सोपविण्यात येतो. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास एटीएसकडे साेपविला आहे. एटीएसच्या समवेत लोहमार्ग पोलीस याचा तपास करीत आहे.
मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी धडाक्यात कारवाई केली होती. सध्या त्यांची महाराष्ट्र एटीएसमध्ये बदली केली आहे. पुण्यात त्यांनी यापूर्वी एक अमली पदार्थाविरोधात कारवाई केली होती. त्यासह राज्यातील १० अमली पदार्थाचे गुन्हे गृह विभागाने एटीएसकडे साेपविले आहेत. त्याप्रमाणे या गुन्ह्यातही २ हून अधिक राज्याचा संबंध असल्याने पुण्यातील हा गुन्हा एटीएसकडे सोपविला आहे.