आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ‘लालपरी’तून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:22+5:302021-06-21T04:08:22+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी ...

आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ‘लालपरी’तून प्रवास
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थानांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आली आहे.
या पालख्यांच्या मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरी तळापर्यंतचा प्रवास एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जाणार आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व बस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.