आशा कांबळेंना अटक, सुटका
By Admin | Updated: May 21, 2014 01:05 IST2014-05-21T01:05:57+5:302014-05-21T01:05:57+5:30
बाबा कांबळे यांनी २००९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली.

आशा कांबळेंना अटक, सुटका
पिंपरी : कष्टकरी महिलांचे विम्याचे हप्ते कंपनीत न भरता तीन लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे व त्यांची पत्नी आशा कांबळे (दोघेही रा. भक्ती कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी मंगळवारी आशा कांबळे यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली, तर बाबा कांबळे अद्यापही फरार आहे. फौजदार सचिन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी छबिता रामचंद्र गलपलु (वय ४०, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी फिर्याद १६ जानेवारीला पिंपरी पोलिसात फिर्याद दिली होती. बाबा कांबळे यांनी २००९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली. त्यांच्याकडे १२३ कष्टकरी महिलांनी विमा उतरविला. गलपुल या एजन्सीकडे एजंट म्हणून काम करीत होत्या. सुरुवातीला हप्त्याचे पैसे गोळा करून कांबळेने मुख्य कार्यालयात जमा केले. मात्र, फेबु्रवारी २०११ नंतर कांबळे दाम्पत्याने हप्त्याचे पैसे कंपनीला भरलेच नाही. त्यामुळे विम्याचे हप्ते रखडल्याचे महिलांना एलआयसीचे पत्र आले. यानंतर हा प्र्रकार उघडकीस आला. याबाबत तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार महिने उलटूनही पिंपरी पोलिसांना कांबळे दाम्पत्याचा शोध लागत नव्हता. अखेर मंगळवारी आशा कांबळे यांना अटक झाली. मोरवाडी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. बाबा कांबळे अद्यापही फरार असल्याची माहिती निकम यांनी दिली. (प्रतिनिधी)