माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा झाली पाहिजे
By Admin | Updated: May 10, 2017 03:57 IST2017-05-10T03:57:04+5:302017-05-10T03:57:04+5:30
नयना पुजारी खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा हा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल आहे़ हा निर्णय जरी योग्य असला

माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा झाली पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नयना पुजारी खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा हा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल आहे़ हा निर्णय जरी योग्य असला, तरी २०१ कलमाखाली शिक्षा कमी असली, तरी गुन्हेगारांना ती झाली पाहिजे़ २०१ कलमाखाली निर्दोष सोडल्याने उद्देश नाहीसा होतो़ याला उच्च न्यायालयात आव्हान दिले पाहिजे, असे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितले़
आरोपीच्या पलायनामुळे या खटल्याला उशीर झाला आहे़ भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष आणण्यापेक्षा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे न्यायालयात हजर करावे़ त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला, ही सबब राहणार नाही़ या खटल्यात न्यायालयाने आरोपींना २०१ कलमाखाली निर्दोष सोडले आहे़ संपूर्ण गुन्ह्यात नयनाचा खून करण्याचा उद्देश हा तिच्यावर केलेला बलात्कार लपविणे हा होता़ कलम २०१ मध्ये असे सांगितले आहे की, हेतू पुरस्सर केलेला हा गुन्हा आहे़ गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठीच तिचा खून केला गेला आहे़ आपल्याकडे खून हा गंभीर मानला जातो़ पण, या गुन्ह्यात बलात्कार हा प्राथमिक हेतू होता़ खून हा दुय्यम उद्देश होता़ पुरावा नष्ट करण्यासाठी खून केला गेला आहे़
या खटल्यातील माफीचा साक्षीदार हा प्रथम तयार होता़ त्यानंतर तो बदलला, पुन्हा तयार झाला़ गुन्ह्यात त्याचा किती सहभाग होता,बलात्कारात त्याचा सहभाग होता, हे पोलीस यंत्रणेने पाहण्याची दक्षता घेतली पाहिजे़ कारण माफीचा साक्षीदार हा गुन्हेगाराच असतो़ गुन्ह्याची सर्व हकीकत कथन केल्यानंतरच त्याला माफी
दिली जाते़
सुधारण्याची संधी म्हणजे समाजाला फाशी देण्यासारखे
ज्या पद्धतीने हा गुन्हा घडला आहे, ते पाहता गुन्हेगारांवर जबर बसविण्यासाठी दिलेला हा योग्य निर्णय आहे़ सर्वोच्च न्यायालयाने काही खटल्यांमध्ये फाशी न देता सुधारणेची संधी द्यावी, असे म्हटले आहे़ पण, अशा गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देणे, म्हणजे समाजाला फाशी देण्यासारखे आहे़ हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ या प्रकारात मोडत असल्याने गुन्हेगारांना फाशी देणे क्रमप्राप्त होते़ मी नेहमी म्हणतो की, न्यायालयात मुदतीत पुरावा सादर केला तर, कमीतकमी वेळेत खटल्याचा निकाल लागू शकतो़ दोन्ही बाजूचे वकिलांवर न्यायालयाने नियंत्रण करुन वेळेत सुनावणी घेतली तर कमीतकमी वेळेत अगदी २ ते ४ महिन्यात निकाल देता येतो, अशी अनेक उदाहरणे आहेत़ गुन्हेगारीला चाप बसवायचा असेल, तर इतक्या उशीरा निकाल लागणे हे समाजाच्या दृष्टीने चांगले नाही़ कोपर्डी सारख्या गुन्ह्यातही अजून निकाल लागलेला नाही़ उशीरा निकाल लागणे हे समाजाच्या चिंतेचा विषय आहे़ अशा गंभीर गुन्ह्यांचे खटल्यांची सुनावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष न्यायालय ठेवले पाहिजे़ त्यांच्याकडे दुसरे कोणतेही काम देण्यात येऊ नये़ असे झाले तर गंभीर गुन्ह्यांचा निकाल तातडीने लावणे शक्य होऊन गुन्हेगारीवर चाप बसविणे शक्य होईल़ दुर्दैवाने आज तशी परिस्थिती नाही़ याचा समाज, न्यायव्यवस्था, राज्यकर्ते, वकील आणि बार असोशिएशनला विचार करायला लावणारी आहे़
- अॅड़ एस़ के. जैन
शासन अद्यापही गंभीर नाही
नयना पुजारी प्रकरणात उशिरा का होईना न्याय मिळाला आहे. पण लागलेला विलंब धक्कादायक आहे. हे प्रकरण खूप संवेदनशील होते. त्यामुळे लवकर निकाल लागणे अपेक्षित होते. विलंबाने लागलेल्या निकालामुळे एकुणच न्यायप्रक्रिया आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सध्या अनेक अशी संवेदनशील प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याची चर्चाही होत नाही. तसेच आठ वर्षानंतरही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे आहे. महिला सुरक्षिततेबाबत राज्य शासन अद्यापही गंभीर नसल्याचे दिसते.- किरण मोघे
निर्णयाची जलद अंमलबजावणी व्हावी
नयना पुजारी खून खटल्याचा निकाल समाधानकारक आहे. उशीरा का होईना आरोपींना फाशीची शिक्षा झाली. मात्र,हा केवळ बलात्काराचा खटला नव्हता तर बलात्कारानंतर आरोपींनी तिचा खून केला होता. त्यामुळे अशा प्रकारचे खटले जलदगती न्यायालयात चावणे आवश्यक आहे.सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रक्रियेतून जाण्याची आरोपींना संधी मिळते. त्यात आरोपींना 18 वर्षांपेक्षा जास्त कालावधी जिवंत रहावे लागते. त्यामुळे या प्रकारचे खटले जलदगती न्यायालयात चालवून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुध्दा जलद पध्दतीने होणे गरजेचे आहे.- मुक्ता मनोहर, ज्येष्ठ कामगार नेत्या
महिलांना सुरक्षित वातवरण देण्याची आजही गरज
नयना पुजारी बलात्कार व खून खटला प्रकरणातील आरोपींना फाशी झाल्याने असे गुन्हे करणा-यांमध्ये किमान भितीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. नयना पुजारी बलात्कार व खूनचे प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु त्यानंतर देखील शहरात असे प्रकार होतच असून, आजही महिला शहरामध्ये सुरक्षित नाहीत. महिला, मुलींना शाळा, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, पोलिस, प्रशासन, सामाजिक संस्था सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे.
- अॅड. वंदना चव्हाण, खासदार
गुन्हेगारांत दहशत निर्माण होईल
नयना पुजारी बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याने या पुढे अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्यांना चांगला चाप बसेल व गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत होईल. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याने उशीरा का होईना, नयना पुजारी हिला न्याय मिळाला.
- मुक्ता टिळक, महापौर
सुरक्षेचे नियम कडक करावेत
महिलांची सुरक्षा ही महिला कर्मचारी असलेल्या कोणत्याही कंपनीतील सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट असली पाहिजे. तसे होत नाही ही खेदाची गोष्ट आहे. नयना पुजारी ही कर्मचारी रात्री उशीरा घरी निघाली होती. तिला सोडणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने हा प्रकार केला. सर्व आरोपींनी शिक्षा झाली. हर्षद निंबाळकर यांनी खटला चांगला लढवला. न्यायालयाचा निकारल गुन्हेगारांना वचक बसेल असा आहे. सरकारनेही हे प्रकरण चांगले हाताळले. अशा गोष्टींमध्ये सरकार कोणाचीही गय करणार नाही, असा विश्वास यातून पीडीत महिलांमध्ये निर्माण होईल. पोलिसांना अशा प्रकरणांचा तपास गांभीर्याने करणाचे आदेश आहेत. कंपन्यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक कडक केले पाहिजेत, तसेच त्यांचे पालन होईल हेही पाहिले पाहिजे.
- मेधा कुलकर्णी, आमदार
शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी
नयना पुजारी प्रकरणातील तिनही आरोपींना दिलेली शिक्षा योग्यच आहे. मात्र, या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी झाल्यास कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल. या प्रकरणाचा निकाल लागण्यास काहीसा वेळ लागला आणि नाही असे म्हणावे लागेल. उत्तर संदिग्ध असले तरी न्याय प्रक्रिया म्हणून केवळ न्यायालय विलंबाज जबाबदार नसते, ती प्रक्रिया असते. एखाद्या गुन्ह्याची सुरुवात पोलीस तपासातून सुरु होते. तपासात काही त्रुटी राहिल्यास त्याचा परिणाम निकालावर होतो.
- अॅड. सुप्रिया कोठारी
घटनाक्रम -
४७ आॅक्टोंबर २००९ : काम संपवून घरी जाणाऱ्या नयना पुजारी हिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण व बलात्कार
४त्याच रात्री येरवडा पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल
४८ आॅक्टोबर : खेड तालुक्यातील जेरेवाडी येथे महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड़ तो नयनाचा मृतदेह असल्याचे निष्पन्ऩ खेड पोलीस ठाण्यातून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा हस्तांतर.
४१६ आॅक्टोबर : गुन्हे शाखेने योगेश राऊत, राजेश चौधरी आणि महेश ठाकूर यांना अटक केली़
४८ डिसेंबर : विश्वास कदम याला अटक
४जानेवारी २०१० : चार आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल
४जुलै २०१० : राजेश चौधरी याचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज, त्याचा इन कॅमेरा जबाब नोंदविला गेला़
४नोव्हेंबर २०१० : राजेश चौधरीचा जबाब न्यायालयात उघड
४फेब्रुवारी २०११ : तीन आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
४१७ सप्टेंबर २०११ : ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना योगेश राऊतचे पोलिसांना चकवून पलायऩ
४जुलै २०१२ : राजेश चौधरीचा माफीचा साक्षीदार होण्यास नकाऱ आरोपी म्हणून खटल्याला सामोरे जाण्याचा न्यायालयात अर्ज
४३१ मे २०१३ : योगेश राऊतला शिर्डी येथे अटक
४जून २०१३ : चौधरीचा पुन्हा माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज़
४मे २०१५ : ससूनमधून पळून गेल्याबद्दल योगेश राऊत याला ६ वर्षे सक्तमजुरी
४२फेब्रुवारी २०१७ : विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा अंतिम युक्तिवाद सुरु
४२६ एप्रिल २०१७ : युक्तीवाद संपले़
८ मे रोजी निकालाची घोषणा
४८ मे २०१७ : तिन्ही आरोपींना दोषी ठरविण्यात आले़
४९ मे २०१७ : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली़