घरकुल मिळूनही लाभार्थी पत्र्याच्या शेडमध्ये
By Admin | Updated: May 26, 2014 05:35 IST2014-05-26T05:35:52+5:302014-05-26T05:35:52+5:30
बारामती शहरातील आमराई परिसरात सुहासनगर येथील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत ८२ घरकुलांची इमारत बांधण्यात आली आहे.

घरकुल मिळूनही लाभार्थी पत्र्याच्या शेडमध्ये
बारामती : बारामती शहरातील आमराई परिसरात सुहासनगर येथील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत ८२ घरकुलांची इमारत बांधण्यात आली आहे. ५ महिन्यांपूर्वी या घरांचा ताबा देखील लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. मात्र, वीज, पाण्याअभावी येथील रहिवाशांना अद्याप पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. या ठिकाणी मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची, विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. सुहासनगर येथे घरकुल बांधताना येथील नागरिक टेलिफोन भवन परिसरात स्थलांतरीत झाले आहे. मात्र, सोसायटी स्थापन करून वीज, पाणी मागणीअर्ज भरणे येथील लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक आहे, असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, येथील नागरिकांना याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. लाईट, पाणी नसल्याने घरकुल ताब्यात मिळून देखील लाभार्थी नागरिकांना पत्र्याचे शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. बारामती शहरातील टेलिफोन भवन समोर असणार्या गाळ्यांमध्ये नागरिकांनी नाईलाजास्तव संसार थाटले आहे. रमाईमाता भवन परिसरात हे नागरिक पत्र्याचे शेड ठोकून वास्तव्यास आहेत. रमाईमाता भवन परिसरात सांडपाणी सोडण्यात येते. मुलभूत सुविधांअभावी या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ५ महिन्यांपूर्वी घराचा ताबा मिळाला आहे. मात्र, लाईट, पाणी नसल्याने अद्याप लाभार्थी या ठिकाणी वास्तव्यास आलेले नाही. घाणीमुळे मोकाट जनावरांचा वावर कायम असतो. तर महिलांना उघड्यावर स्वयंपाक करावा लागतो. घराचा विषय मार्गी लावला, आता वीज, पाण्याचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिक सुनिल चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांच्या उदासीनतेमुळे हा विषय मार्गी लागला नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. सोसायटी स्थापन करून वीज, पाणी पुरवठा करणे नगरपरिषदेसाठी एका दिवसाचे काम आहे. मात्र, सामान्य लाभार्थ्यांमधून सोसायटी चेअरमन निवड केली जात नाही. याच चेअरमन निवडीच्या आग्रहातून या ठिकाणी सुविधा झाल्या नाहीत, असा आरोप काळुराम चौधरी यांनी केला आहे.