महिलांच्या दारूबंदी लढ्याला अण्णा हजारेंचे पाठबळ
By Admin | Updated: February 2, 2016 01:12 IST2016-02-02T01:12:36+5:302016-02-02T01:12:36+5:30
निघोज या गावातील महिलांना केवळ मतदानात पारडे जड न राहिल्याने दारूबंदी करणे साधले नसले तरीही त्यांनी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे धाव घेतली आहे.

महिलांच्या दारूबंदी लढ्याला अण्णा हजारेंचे पाठबळ
टाकळी हाजी : निघोज या गावातील महिलांना केवळ मतदानात पारडे जड न राहिल्याने दारूबंदी करणे साधले नसले तरीही त्यांनी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे धाव घेतली आहे. अण्णांनीही या लढ्याला पूर्ण पाठबळ देण्याचे जाहीर केले आहे.
दारूबंदीचा निर्धार केलेल्या निघोजमधील (ता. पारनेर) महिलांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेतली. निघोज गावातील दारूबंदीविरोधातील निवडणूक प्रक्रिया रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याची सूचना करणार आहोत. निघोजच्या ग्रामस्थांनी व महिलांनी दारूबंदीसाठी जो लढा दिला आहे तो निर्णायक होण्यासाठी आपले पूर्ण पाठबळ या आंदोलनाला असल्याचे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘या देशात लोकशाही चळचळ रुजविण्यासाठी नेत्यांनी बलिदान दिले आहे, मात्र दारू धंद्यांना उत्तेजन देण्यासाठी हेच लाचखोर अधिकारी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. दारूबंदी चळवळीत आपण गेली अनेक वर्षे सक्रिय आहोत; मात्र असा काही प्रकार झालेला नाही. मात्र निघोजच्या महिलांचे आंदोलन राज्यभर गाजले याची भीती सरकारला आहे म्हणूनच या दारूबंदी आंदोलनामुळे दारूपासून मिळणारे उत्पन्न घटू नये यासाठीच दारूबंदी चळवळ मोडीत कशी निघेल यासाठी उभ्या बाटलीसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार आहोत. असे भ्रष्टाचारी अधिकारी घरी गेलेच पाहिजे तसेच त्यांना शासनही झाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. फेरनिवडणूक घ्या ही प्रमुख मागणी राहणार असून, निघोजच्या महिलांचा लढा निर्णायक होण्यासाठी आपणही आंदोलनात उतरून सर्वतोपरी पाठबळ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)