आळंदीचा विकास रखडला

By Admin | Updated: May 25, 2015 05:48 IST2015-05-25T05:48:51+5:302015-05-25T05:48:51+5:30

आळंदीसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुमारे २१८ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला; परंतु यापैकी आत्तापर्यंत फक्त २३ कोटींचीच कामे

Alandi's development stalled | आळंदीचा विकास रखडला

आळंदीचा विकास रखडला

आळंदी : आळंदीसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुमारे २१८ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला; परंतु यापैकी आत्तापर्यंत फक्त २३ कोटींचीच कामे पूर्ण झाली आहेत, तर ९८ कोटींची कामे सुरू आहेत. ९७ कोटींच्या कामांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
खर्च झालेल्या निधीपैकी बहुतांश निधी हा ठेकेदारांना अनामत रक्कम देण्यातच गेला आहे. ज्यांनी हा निधी अनामत म्हणून उचलला त्यांनी काम अर्धवट अवस्थेत सोडले, तर काही कामे पूर्ण झालेली आहेत. जी पूर्ण झाली, त्याची केवळ देखभाल व्यवस्थितपणे न झाल्यामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. शासनाने २०११ पासून सुमारे २१८ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; मात्र योग्य नियोजनाचा अभाव, रखडलेली भूसंपादन प्रक्रिया, हितसंबंध, टक्केवारीचे राजकारण या एकूणच प्रक्रियेत आलेला हा निधी खर्च होऊ शकला नाही. परिणामी तब्बल ९७ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी खर्चाअभावी पडून राहिला आहे.
इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द येथील १२ मीटर रुंदीचा पूल तयार करण्यात आला असला, तरी त्या वरील जोड रस्त्याचे काम अपूर्ण व अर्धवट अवस्थेतच आहे. चऱ्होली पूल व आळंदी-मरकळ रोड यांना जोडणारा १८ मीटर रुंदीचा व २ किमी लांबीचा बाह्यवळण रस्ता शेतकऱ्यांच्या विरोध, विद्युतखांबांचे स्थलांतर आदीमुळे रखडले आहे. चाकण चौक ते सिद्धबेट हा १००० बाय ९ मीटरचा रस्ता भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली नाही म्हणून प्रलंबित आहे.
मंजूर कामांपैकी जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधणे हा १०० बाय १२ मीटरचा पूल तेवढा पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी खुला आहे; मात्र गोपाळपुरा घाट ते दक्षिणेस इंद्रायणी नगरकडे जाण्यासाठी इंद्रायणी नदीवर लोखंडी पूल बांधणे व पुलाच्या दक्षिण बाजूस तीरावर घाट बांधणे, भक्ती सोपान सेतूचे मजबुतीकरण करणे, वाहनतळांपैकी पुणे-आळंदी रस्त्यावरील नदीकाठचा भाग, चाकण चौकातील आरक्षण अद्यापही ताब्यात घेता आले नाही. वडगाव-आळंदी रस्ता, नदीपात्रालगतचा आळंदी रस्ता, पुणे-आळंदी रस्ता, न. प. कार्यक्षेत्रातील स्मशानभूमी, हेलिपॅड तयार करणे, ही कामे अंदाजपत्रकाअभावी, तर काही जागा निश्चिती व अन्य कारणास्तव प्रलंबित आहेत.
सार्वजनिक शौचालयाच्या सोयीसाठी अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांचे मजबुतीकरण करण्यासाठी तब्बल ८.२९ कोटी खर्च केले. यात १४ शौचालयांचे काम पूर्ण झाले; मात्र यातील अनेक शौचालयांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची सोय नाही, म्हणून ती वापराविना कुलूपबंद अवस्थेत आहेत. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस आॅर्गनायझेशन संस्थेंतर्गत तब्बल १६ कोटींचा खर्च करून शाळा क्र.१च्या आवारात भव्य शौचालये उभारण्यात आली आहेत, तर एका इमारतीचे काम चालू आहे. एकूण १७ ठिकाणी शौचालये बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र नियोजनाप्रमाणे ती बांधली नाहीत. मंजूर जागा एका ठिकाणी, तर बांधकाम दुसऱ्या ठिकाणी, अशी अवस्था केली आहे.
सुजल निर्मल अभियान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शुद्ध पाण्यासाठी तडफडणाऱ्या आळंदीकरांना लवकर पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तब्बल २२ कोटींचा हा प्रकल्प शासनाने मंजूर केला; मात्र २०१३ पासून या प्रकल्पाचे संथगतीने काम सुरू आहे. सिद्धबंद स्थळाचा विकास, पार्किंग, उद्यान, पर्णकुटी, प्रसादालय, ध्यानमंदिर, स्मारक, माउली सृष्टी या कामांचा कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नाही. इंद्रायणी तीरावरील नदीपात्रालगतच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असले, तरी इतर कामांकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Alandi's development stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.