मृत्यूनंतरही डॉक्टरांची करावी लागली प्रतीक्षा
By Admin | Updated: December 22, 2015 23:57 IST2015-12-22T23:57:44+5:302015-12-22T23:57:44+5:30
शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) मृतदेह आणला. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तब्बल सहा तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले

मृत्यूनंतरही डॉक्टरांची करावी लागली प्रतीक्षा
पिंपरी : शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) मृतदेह आणला. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तब्बल सहा तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी घडली.
थेरगाव येथील विशाल सुरेश मोहिते (रा. थेरगाव) या तरुणाने मंगळवारी सकाळी आत्महत्या केली. पोलिसांनी विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात सकाळी साडेनऊच्या सुमारास आणला. त्या वेळी रात्रपाळीचे डॉक्टर निघून गेले होते, तर दिवस पाळीला असणाऱ्या डॉक्टरांची पोलीस व नातेवाईक वाट पाहत बसले होते. दिवस पाळीला डॉक्टर कोण आहेत, ते केव्हा येतील, या विषयी नातेवाईक शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करीत होते.
दोन तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शवविच्छेदन गृहात एकही डॉक्टर हजर न झाल्यामुळे काही नातवाईक रुग्णालयातील इतर विभागांकडे चौकशीसाठी गेले. तेथे त्यांना डॉक्टर निघाले आहेत. थोड्या वेळात येतीलच, असे सांगण्यात आले. मात्र, दुपारी १पर्यंत एकही डॉक्टर न आल्याने नातेवाइकांचा राग अनावर झाला. त्यांनी पुन्हा रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टर व लिपिक यांना जाब विचारला. या वेळी त्यांना ‘काही डॉक्टर रजेवर असून, आज फक्त एकच डॉक्टर येणार आहेत. ते देखील तपासणीसाठी ससून रुग्णालयात गेले असून, ते आल्यावरच विच्छेदन करण्यात येईल’ असे सांगितले.
काही नातेवाइकांनी या डॉक्टरांशी संपर्क साधला असता, त्यांचा फोन बंद होता. या प्रकारामुळे नातेवाईक अधिकच संतप्त झाले. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्या वेळी तेथील पोलीस संतप्त नातेवाइकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. वायसीएमच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. तो कारभार सुधारावा अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)