ढगाळ हवामानामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:00+5:302021-01-08T04:30:00+5:30
मात्र प्रतिकूल परिणाम रब्बी पिके, फळबागा संकटात बुरशीजन्य रोग वाढणार बारामती : बारामती उपविभागामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार ...

ढगाळ हवामानामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम
मात्र प्रतिकूल परिणाम
रब्बी पिके, फळबागा संकटात
बुरशीजन्य रोग वाढणार
बारामती : बारामती उपविभागामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाले आहे. इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी पाऊसही होत आहे. या वातावरणाचा पिकांवर मात्र प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान रोगांचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल आहे. त्यामुळे या दिवसांत रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.
बारामती कृषी विज्ञान केंद्राने असे वातावरण पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचे सांगितलेे. सातत्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम पिकांवरही होत आहे. त्यामुळे थंडीदेखील कमी झाली आहे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच कांदा पिकावर करपा, गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही हवामान त्रासदायक ठरत आहे. एकूणच रब्बी हंगामातील पिकांना सध्याचे हवामान त्रासदायक ठरत आहे. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या हवामान काळात पिकांची काळजी कशी घ्यावी, कीडरोगांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे. या वातावरणाने हरभरा व गहू, तूर, भाजीपाला आदी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ढगाळ व दमट वातावरणामुळे द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वातावरणात द्राक्षबागांवर ‘प्लझमोपॅरा व्हीटीकोला’ म्हणजेच ‘डाऊनी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच डाळिंब बागांवर देखील बुरशीजन्य
रोगाची शक्यता आहे. द्राक्षावर कमी-अधिक प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आर्द्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे द्राक्षपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाला दमट वातावरण अनकूल असते. डाऊनीची लागण द्राक्षबागांमध्ये पाने, फुले व घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात व रोगग्रस्त भाग निकामी होतो. या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते. ढगाळ हवामानामुळे फळबागांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तर भाजीपाला आणि तृणधान्य पिकांवर तांबेरा रोग येईल. शेतकऱ्यांनी तातडीने फवारण्या घेऊन रोगराईला आळा घालावा.
- दत्तात्रय पडवळ
तालुका कृषी अधिकारी, बारामती
प्रकाश संश्लेषण क्रिया ढगाळ हवामानामध्ये रोखली जाते. परिणामी फळबागांवर बुरशीजन्य रोग वाढतात. रोगराई रोखण्यासाठी ८० टक्के गंधक असलेली औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी करावी.- डॉ. मिलिंद जोशी
पीकसंरक्षकतज्ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र बारामती
द्राक्षबागांवर ढगाळ हवामानामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
०४०१२०२१-बारामती-१४
बहरात आलेल्या गव्हावर वातावरण बदलामुळे तांबेऱ्याचा धोका आहे.
०४०१२०२१-बारामती-१५
----------------------------