पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. पहलगाममध्ये मंगळवारी (दि.२३) दुपारी ३:३० वाजता हल्ला झाला आणि या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचे वृत्त वेगाने पसरले. बुधवारी दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच पुणेकरांचे मन हेलावले. त्यानंतर आज पुण्यात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पाकिस्तानी लोकांना देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना परत जाण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. ४८ तासात ते देश सोडून न गेल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवादी विरोधात लढण्याचा आमचा इरादा अजून मजबूत झाला आहे. सिंधू नदी कराराबाबत बोलतां ते म्हणाले, पाकिस्तान मध्ये तीन-चार पाणी योजना सुरू आहेत. एका दिवसात हे सगळं होत नाही. ज्या पाण्यावर पाकिस्तान अवलंबून आहे. ते जर बंद केलं तर पाण्याविना ते तडफडतील. शरद पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी मान्य करायचं त्यांनी मान्य करावं. ज्यांना डोळे उघडे ठेवून झोपेचे सोंग घ्यायचा असेल त्यांची कोणाचीही वक्तव्य मी ऐकली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा कुटुंबातील व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. या सहा परिवाराला निश्चित मदत केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. आसावरी जगदाळे यांनी केलेलं वर्णनामुळे मन हेलावून जाणारा असून हे सगळं अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बेकायदा पाकिस्तानी सुद्धा सापडतील
बेकायदा पाकिस्तानी सापडतील असे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यांना 48 तासात पाठवण्याची प्रक्रिया होईल. मात्र जे बेकायदेशीर राहतील ते सुद्धा सापडतील. ज्या पद्धतीने बांगलादेशी सापडले तसेच बेकायदा पाकिस्तानी सुद्धा सापडतील ही पॉलिसी केंद्राने ठरवलेली आहे. काही बाबतीमध्ये आपण मानवतावाद दाखवतो.